Monday, September 7, 2015

त्या उतार वेळी...

त्या उतार वेळी...

त्या दिवशी संध्याकाळी बागेतील एका बाकड्यावर मी शांत बसून  बागेत फेऱ्या मारणाऱ्या वयस्क मंडळींना न्याहाळत होतो… वयाची साठी सत्तरी ओलांडलेली मंडळी… मग ते आजोबा असोत नाहीतर आजी. छानपैकी -अंगात टी शर्ट… पूर्ण इजार… पायात बूट… तसे आजींच्या ही पायात बूट… अशा जय्यत तयारीत बागेत प्रवेश होताना दिसत होता त्यांचा. त्यांचे बागेतील मोठ्या पट्यातून फेऱ्या मारण्याचे काम चालू होते.  प्रत्येकासोबत कोणी तरी होतेच. चालता- चालता गप्पा मात्र चालू. 
आयुष्यातील आपल्या जबाबदाऱ्यातून निवृत्त झालेली मंडळी संध्याकाळच्या वेळेस नाक्यावरच्या कट्ट्यावर अगदी गटागटाने गप्पा मारताना नाहीतर बागेत फेऱ्या मारताना दिसतात.  मला थोडी उत्सुकता होती... निवृत्ती नंतरचं शहरातील आयुष्य कसं असतं ? त्यांचे विचार कसे असतात ? त्या विचारांची देवाण घेवाण कशी असते ? त्यांची जगायची रीत कशी ? वागायची रीत कशी ? एकंदरीत त्यांच्या आयुष्याचा प्रवास कसा ? ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं, शोधण्याचा म्हणण्यापेक्षा जाणून घेण्याचा माझा प्रयत्न होता… मला प्रश्न पडत होता तो- रोज भेटणारी ही मंडळी रोज काय गप्पा मारत असतील ? हेच जीवनाचे  अंतरंग मला उलगडलेले पाहायचे होते. 
पण मनात लगेच विचार आला…  आयुष्यातील सत्तर वर्षांचा अनुभव काय कमी आहे  ? विषय काय कमी आहेत ? बरं, व्यक्ती वेगळ्या... प्रत्येकाचं आयुष्य वेगळं… त्यातील प्रसंग वेगळे…  पाहिलेले सुखाचे क्षण वेगळे… भोगलेले दुःख वेगळे…
 त्यातीलच दोघेजण गप्पा मारत मारत   माझ्या शेजारी बाकड्यावर येऊन बसले… सावकाशपणे… वयाची सत्तरी पंचाहत्तरी गाठलेले… चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, वार्धक्याने आलेल्या सुरकुत्यांपेक्षा जास्त खोल दिसत होत्या… त्यामुळे चेहरा खाली ओघळल्यासारखा दिसत होता. डोक्यावरच्या केसांनी केव्हाच निरोप घेतलेला दिसत होता. थोड्याफार प्रमाणात कानाच्या  मागच्या बाजूस मानेवर घसरलेले  तुरळक पांढरे  लांब केस मध्येच दिव्यांच्या प्रकाशात चमकत होते. ते दोघे मोठमोठ्याने गप्पा मारताना दिसत होते. आणि असे असूनसुद्धा एकमेकांचे काही शब्द ऐकू येत नसल्याचे त्यांच्या भावचर्येवरून स्पष्ट जाणवत होते… मधल्या काळात ते एकमेकांना भेटले नसावेत असं त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होते.  माझी उत्सुकता शिगेला पोहोचली. बागेतील त्या मंडळींना नुसतंच न्याहाळत बसण्यापेक्षा काहीतरी नवीन उद्बोधक कानावर पडणार, ह्या विचाराने मी संतुष्ट झालो. तरीही मी त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता स्वस्थ बसून राहिलो. नाही म्हणायला मी एक छानसं छोटंसं पुस्तक हातामधून नेलं होतं… त्यात नजर खिळवून माझ्या कानांचे, हत्तीचे कान करून एकाग्र झालो…
‘काय रे नारायणा, अरे कुठे होतास इतके दिवस? भेट नाही की फोन नाही… ना एखादा निरोप…
त्या रामदासाकडे चौकशीही केली… पण हाती काहीच लागलं नाही…’ माझ्या शेजारी बसलेल्या काकांच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
माझ्या लक्षात आलं… बाकड्याच्या त्या टोकाला बसलेले नारायण काका होते. माझ्याकडेच त्यांचे तोंड होते. पण अलीकडे बसलेल्या काकांची मात्र माझ्याकडे पाठ होती.  एका अर्थी ते बरेच होते माझ्यासाठी… नारायण काका बरेच दिवस बागेत फिरायला आलेले नव्हते म्हणजे काही तरी विशेष असणार त्यांच्याकडे आणि तेच मला आज ऐकायला मिळणार, अशी माझी पक्की खात्री झाली…
‘अरे कुलकर्णी,  मी गावी गेलो होतो. बरेच दिवस योजत होतो… पण जमत नव्हतं. पण शेवटी जमलं एकदाचं… आलो जाऊन… अरे छान पंधरा दिवस मित्राकडेच राहिलो होतो…  माझा बालमित्र. अगदी लंगोटी यारच म्हण ना. त्या कोकणच्या लाल मातीतलं आमचं खेळणं… बागडणं… त्या वातावरणातलं हसणं… खिदळणं… सारं सारं काही उराशी साठवून यावेळेस गेलो होतो गावी… आयुष्यातील सोळा-सतरा वर्षे आणि त्यातलं बालपण त्याच मातीत वाढलं होतं… उमललं होतं… मातीतल्या गंधात एकरूप होऊन गेलं होतं. काजू… फणस… आंब्याच्या रुपात उतरलेल्या, त्या मातीतल्या अमृताची चाखलेली चव अजुनही जिभेवर रेंगाळतेय. तीच चव त्याच बालीशपणाने मला चाखायची होती. त्या खेळाचा आनंद लुटायचा होता माझ्या सवंगड्या बरोबर… त्याच मस्तीत… त्याच धुंदीत… आणि ते ह्या वयात जमतंय का ते आजमावून पाहायचं होतं…’
‘कुलकर्णी, तुला खरं  सांगू ? गेली साठ पासष्ट वर्षांपूर्वीच्या साऱ्या आठवणींवर साठलेली काळाची धूळ मला माझ्या ह्या थरथरत्या हाताने हळुवार बाजूला सारायची होती.  त्यानंतरचा त्याच्या ताजेपणाचा सुगंध मला हुंगायचा होता… काय ते दिवस होते… मित्रा, माझं बालपण फार फारच मजेत गेलं… शिक्षणही  बरं  चाललं होत… पण माझ्या शालेय जीवनांतच माझ्या डोक्यावरचं छत्र हरपलं. माझे बाबा आम्हाला सोडून गेले. अकस्मात. कुठली रोगाची साथ आली अन संपलं सगळं. आमचं कुटुंब तसं छोटंच होतं.  दोन बहिणी आणि मी. सगळी जबाबदारी आईवर येऊन पडली. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे थोडं सावरलं गेलं पण शेवटी प्रत्येकाचा संसार… कोण कुणासाठी किती करणार ? कुणाला दोष द्यायचा ?’
‘एक मुलगा म्हणून  कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर होती. कशी बशी दहावी पूर्ण केली अन बाहेर पडलो ते थेट मुंबापुरी. अरे मुंबईतही येऊन राहायचं म्हणजे कुणाचा तरी आधार हवाच… त्याशिवाय स्थैर्य येणं कठीण. आपलं म्हणायला आणि मानायला कोणीतरी असावंच लागतं… माझ्या काकीकडून मला ते मिळालं…  त्यांच्याकडेच माझं सगळं स्थिरस्थावर झालं… नोकरी मिळाली. बहिणींची लग्नं झाली… हळू हळू सगळं मार्गावर येऊ लागलं… शेवटी विवाह बंधनात गुंफून घ्यायची माझी वेळ होती… कोकणातल्या एका सुशील कन्येशी माझा विवाह झाला… कुटुंबाला आधार मिळाला… संसाराची घडी नीट बसली… आणि माझा संसारिक जीवनप्रवास सुरु झाला.  खूप उशिरा कन्या रत्न झालं. खूप आनंदी झालो आम्ही. गिरणगावातील दहा बाय दहाच्या खोल्या म्हणजे एकत्रीत कुटुंबासाठी कबुतरांची खुराडीच म्हणायची…  अशा  छोट्या खोलीत दिवस काढायचे म्हणजे दिव्यच म्हणावे लागेल. काही दिवस तसेच काढले.  पण मग गिरणगाव सोडावे लागले. कन्या मात्र इकडेच राहिली… आजी-आजोबांकडे. तिचं शालेय शिक्षण चालू होतं…’
माणसाचा जीवन प्रवास असाच… सुख-दुःखाचे चढ उतार अगदी स्वाभाविकपणे चढायचे… उतरायचे… त्याला इलाज नसतो. प्रत्येकजण आपापल्या परीने… कुवतीने त्यावर मात्रा शोधत असतो. केव्हा ती लागू पडते तर केव्हा नाही… पण माणूस जगायचा… चालत राहायचा थांबत नाही… हीच तर जीवनाची खासियत आहे…’
‘कुलकर्णी, आम्ही ठाण्याला असतानाच माझे श्वसुर वार्धक्याने गेले.  सासूबाई घरी एकट्याच… माझी पत्नी, एकुलती एक कन्या असल्याने आम्हाला परत गिरणगांवात येऊन राहावं लागलं. शिवाय माझी कन्या तिथे… त्यामुळे सारा संसार पाठीवर उचलला आणि लालबागच्या त्या छोट्या खोलीत विसावलो. मध्येच माझ्या नोकारीवर गडांतर आले. विवंचना वाढल्या… मानसिक खच्चीकरण झालं… त्या काळात माझा आधारस्तंभ म्हणू माझी पत्नी माझ्या मागे उभी राहिली.  त्यातूनही सावरलो. भांडुपच्या एका नामांकित कंपनीत मला चांगली नोकरी मिळाली… सगळं कसं छान चालत राहिलं… एका बाजूला संसार सुरळीत चालला होता आणि दुसरीकडे कन्येचं शिक्षण चांगल्या पद्धतीने चाललं होतं. खूप मेहनती माझी मुलगी… शिक्षण पूर्ण होऊन तिला चांगली नोकरी लागली. तशी सुशील आणि प्रमाणिकही… आता तिची जबाबदारी जवळ येऊन ठेपली होती. केव्हा ना केव्हा दोनाचे चार करायचे तर मग ह्या कार्याला उशीर का ? म्हणून चांगलं स्थळ शोधून तीचं मंगलकार्य करून टाकलं…’
‘पण कुलकर्णी, नाशिबाचे फेरे कुणालाही चुकलेले नाहीत. थोड्याच दिवसात तिच्या संसाराची राख रांगोळी झाली. उदयास आलेली स्वप्नं धुळीस मिळाली. नैराश्याने पाठलाग सुरु केला.  ऐन उमेदीत असह्य धक्का… त्यातून सावरणे तसं अवघड असतं. प्रत्यक्षात साकारत असलेल्या त्या भातुकलीच्या खेळाची सुरुवातच, संपण्याने झाली. अरे, ह्या कोवळ्या वयात खरं तर असे धक्के माणसाच्या आयुष्यात कधीच यायला नकोत रे. आयुष्य म्हणजे असंच सारं असतं हेही मान्य.  पण ते ह्या वयात भोगायला लागावं ह्यापेक्षा दुसरं दुर्भाग्य नाही… तिच्या आयुष्याच्या ह्या उमेदीच्या वळणावर तिच्या वाट्याला आलेल्या दुःखातून सावरणं तर आवश्यक होतं… समोर एक विराण वाळवंट … भर दुपारच्या कडक उन्हाने तयार झालेल्या मृगजळा सारखं दिसणारं आशावादी आयुष्य… खरंच प्रत्येक्षात तिच्या वाट्याला येणार होतं की नव्हतं याची खात्री नव्हती…’
‘दूसरीकडे माझी दुसरी नोकरीही गेली. आमची कंपनीच बंद झाली… पुनः त्या वयात नोकरीसाठी वणवण… मानसाला कडक उन्हाचे चटके बसले तरच सावलीची महती कळते… तेच परिस्थितीचे कडक चटके मला बसत होते…’
मानवी जीवनातील अत्यंत मोलाची भूमिका बजावणारा… ‘काळ’, हा आपल्याच गतीने चालत राहतो… अन त्याबरोबर आपल्यालाही चालत राहावं लागतंएक आशावाद उराशी बाळगूनपदरी आलेल्या निराशेवर काळ हाच जालीम उपाय असल्याची जाणीव मनाला पटवून देऊन मार्गक्रमण करत राहतो माणूस…’
‘त्याच सूत्राने मला माझी नवीन नोकरी मिळाली… घर स्थिरस्थावर झालं…. कालक्रमण चालू होतं तसं आयुष्यक्रमणही चालू होतं. कन्येच्या त्या मानसिक धक्यातूनही तिचं सारं चित्त नोकरीत. आपल्या व्यवसायात गुंतलं होतं ही  एक त्या वेळेपुरती तरी समाधानाची बाब होती आमच्यासाठी… तिचा हा स्वभाव, तिला तिच्या भावी आयुष्याच्या जडणघडणीस सहाय्यभूत ठरला. लवकरच एक चांगलं स्थळ आलं अन ती आनंदाने संसारात एकरूप झाली. सर्वस्वी स्वतःची जबाबदारी समजून. गेल्या काही काळात आमच्या संसारावर आलेलं चिंतेचं अन दुःखाचं मळभ दूर झालं. आमचा संसाररूपी रथ आनंदाने चालत राहिला… सगळं कसं व्यवस्थित मनासारसं चाललं होतं… माझ्या कन्येला एक गोंडस कन्यारत्न झालं. आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. घरात एक बाळ. तेही माझ्या कन्येनंतर पहिलंच. सामान्य   आई वडिलांना आणखी दुसरं काय हवं असतं ? आपल्या बाळाचं आयुष्य सुखी समाधानी असावं एवढंच. तीच सार्थ अपेक्षा परमेश्वराने पूर्ण केली आमची…’
नारायण काकांचं चाललेलं कथन मी तर कान टवकारून ऐकत होतो. तसंच कुलकर्णी काकासुद्धा मन लावून ऐकत होते. खरं तर त्यांचंही आयुष्य तेवढ्याच उंचीचं, खोलीचं असणार… तरीही एक जिव्हाळा होता त्यामागे.  जीवनाच्या मावळत्या काळात एक मित्र म्हणून एकमेकांना नैतिक पाठबळ देणं… आधार देणं हे मैत्रीचं प्रथम कर्तव्य आहे हे ते पूर्णपणे जाणून होते. चार शब्द ऐकून समोरच्याचं दुःख हलकं होण्यास मदत करायची; अन दोन शब्दांनी  मानसिक आधार वा पाठबळ द्यायचं, हे गणित त्या वयात सर्वांनाच अनुभवाने अवगत असतं…  माझ्या लक्षात आलं… नारायण काका आज आपला जीवनग्रंथच कुलकर्णी काकांसमोर वाचत होते…
‘आम्ही शोनुल्याचं म्हणजे माझ्या नातीचं बालपण बघितलं… तिला अंगाखांद्यावर खेळवल्याचं सुख उपभोगलं… माझी पत्नी तर खूप आनंदी होती. त्यातच सहा सात वर्षे कशी पाखरासारखी  भुर्रकन उडून गेली हे कळलं सुद्धा नाही. पण माझ्या पत्नीच्या डोळ्यांच्या आजारामुळे तिची नजर एकदम कमी झाली. तिला दिसेनासं झालं… औषधोपचार करूनही काही विशेष फायदा झाला नाही. घरात वावरणं सवयीचं झालं होतं तिला.  पण बाहेर जाणं कमी झालं. हळूहळू  घरातली हालचालही कमी झाली. मनाने एकदम खचून गेली ती. अन तिने बिछाना पकडला तो परत कधीही न उठण्यासाठी… त्या काळात तिचे शारीरिक हाल झाले… ते हाल पाहवत नव्हते मला… पण ह्या वयात मी तरी काय करू शकणार होतो ? सर्व काही परमेश्वराच्या हवाली केलं होतं… तरीही एक दिवशी ह्या पृथ्वीतलाबरोबर माझाही निरोप घेऊन ती स्वर्गलोकी झाली.  खूप यातना झाल्या रे… कुलकर्णी, ज्या वयात माणसाला खरोखरच एका साथीदाराची गरज असते त्या काळात असा वियोग होणे मनाला सहन नाही झालं. पुरता कोलमडून गेलो. पण  समोर पिल्लू होतं आमचं…  तिचा सुखी संसार होता… मन रिझवायला  नात होती… इथेही पुढे काळ उभा राहिला. मित्रा, काळापुढे सगळे नतमस्तक !’
‘मित्रा, तेव्हापासून माझा आधार माझी कन्याच.  तिच्याकडेच माझं उर्वरित आयुष्य व्यतीत होत आहे. पाहुणे मंडळी, नातलग थोड्या दिवसांचेच असतात ह्या मुंबईसारख्या शहरात. प्रत्येकजण आपापल्या व्यापात. कुणाला वेळ असणार आपल्यासाठी वेळ द्यायला ?  माझं जीवन असं एकमार्गी झालं. उर्मी खलास झाली. निवृत्तीनंतर काय करायचं हा फार मोठा प्रश्न असतो माणसापुढे.   त्याला उत्तर तेव्हा मिळतं, जेव्हा आपल्या भाव-भावना वाटून घ्यायला आपलं हक्काचं माणूस आपल्या जवळ असतं. की ज्याने आपल्या बरोबरीने संसाररुपी रथ हाकलेला असतो… सुख दुःखात साथ दिलेली असते… कठीण प्रसंगी परमेश्वरासारखी, भक्कम आधारस्तंभ म्हणून पाठी उभी राहिलेली असते… केव्हा केव्हा वाटतं आपलं आयुष्य कुणासाठी ओझं म्हणून राहायला नको… त्यांच्या संसारात अडचण म्हणून आपण नसावं… अशा प्रकारचे विचार कितीही मनाला काट्यासारखे  बोचत असले, तरी आहे ह्या परिस्थितीत दिवस काढल्याशिवाय पर्याय नाही. अर्थात कन्येच्या वागण्या-बोलण्यातून मला कधीही असं जाणवलं नाही. तो तिचा स्वभावच नाही.  किंवा जावईबापूंच्या मनालासुद्धा हा विचार कधी शिवला नाही…   हेही माझ्या पूर्व जन्माचं संचित आहे हे मात्र नक्की…’
 ‘कुलकर्णी, आपण बघतोच ह्या समाजात काय चाललंय ते… पोटची पोरं एक-दोन नाही तर चार-चार  असून सुद्धा म्हातारपणात हाल होतात लोकांचे. त्याही पलीकडे, पोरं सुजान असली तरी ह्या शहरी संस्कुतीमुळे त्यांच्या वागण्यात बदल झालेला असतो… घरी सुबत्ता… सगळी व्यवस्था असून सुद्धा आपल्यासारख्या इतर वृद्धांना वृद्धाश्रमात राहावं लागतं ह्याला काय म्हणावं… बोल ? त्यांचंही काही चुकतंय असं नाही वाटत… अरे ह्या जगाची संस्कृतीच बदललीय… जगण्याची रीत बदललीय आणि त्याच बदललेल्या जगाचा ते घटक आहेत म्हटल्यावर ते तसेच वागणार… प्रत्येकाने आपलं स्वतःचं, स्वतःभोवती एक वलय करून घेतलंय. त्यात ते आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त कुणालाही सामावून घेत नाहीत. आई-वडील हे कुटुंबातले सदस्य तोपर्यंतच, जोपर्यंत त्यांचं आपलं स्वतःचं असं कुटुंब तयार होत नाही… बस नंतर संपलं… जाऊदे, आपल्या नाशिबाने तशी वेळ आपल्यावर आणली नाही ह्याबद्दल परमेश्वराचे आभारच मानावे लागतील.’ नारायण काका आपल्या मनात घुसमटत असलेल्या विचारांना वाट मोकळी करून देत होते. भोवतालच्या परिस्थितीचं विदारक चित्र ते कुलकर्णी काकांसमोर वाचत होते… कुलकर्णी काकांचंही जवळपास तशाच प्रकारचं शल्य. दोघांचाही वार्धक्याच्या दिशेने प्रवास… फक्त वाटा वेगवेगळ्या… भोवतालची परिस्थिती वेगळी…’
‘नातीचं शिक्षण अन शाळा ह्यातच मी रमून गेलोय. दिवसभराचा वेळ, घरात एकट्याला भूतासारखा खायला उठायचा. परंतु हळूहळू  सवय झाली त्या मोकळ्या वेळाची.  नित्य नेमाने वर्तमान पत्रं पिंजून काढायची हा ठरलेला शिरस्ता. सहा वर्षे झाली…. पण आता सारं सारं काही अंगवळणी पडलंय…’
‘परवा गावी गेलो.  हरिणीच्या पाडसासारखं दुडूदुडू उड्या मारणारं बालपण मी पुन्ह्यांदा अनुभवलं. मनातल्या सर्व इच्छा… ज्या आयुष्यात कधी योजल्या नव्हत्या त्या पूर्ण झाल्या… जी स्वप्नं कधी पाहण्याचं मनांत आलंच नाही तिही पूर्ण केली माझ्या मित्राने… ‘हा माझा मार्ग एकला’ ह्या सूत्राने माझं आयुष्यक्रमण चालू होतं. विधात्याने दिलेला जन्म त्याच्याच इच्छेपर्यंतच्या काळासाठी ह्या देही ठेवायचा हेच अनुक्रमलं  होतं  मी. माझ्या मित्राचा बेत काही वेगळाच होता. त्याची पंचाहत्तरी साजरी करण्याचा बेतच मला गावी घेऊन गेला होता.  त्याच्या आणि माझ्या वयात जास्त अंतर नव्हतं… फक्त दहा दिवसांचं. मी गांवी गेल्यानंतर आम्ही आमच्या बालपणाला आमंत्रित केलं होतं… त्याच मस्तीत चालत होतो… वागत होतो… राहात होतो… मीही खूप आनंदात होतो त्याच्या त्या कार्यक्रमामुळे. कारण असे योग खूप कमी येतात…’
‘त्या दिवशी बरीच धावपळ… घरातील सदस्य… मित्र मंडळी… सारे व्यस्त… पाहुण्यांची उठबैस… ये जा… सगळं  कसं  छान चाललं होतं… सर्व तयारी झाली… कार्यक्रमाची वेळ समीप येऊन ठेपली… तसे सर्वजण माझ्या दिशेने… मला काहीच कळेनासं झालं…   त्यांनी माझा हात हळुवार हातात पकडला आणि त्या पवित्र खुर्चीत नेऊन बसवलं… मी अवाक ! हे काय चाललंय… कार्यक्रम कोणाचा… कोणासाठी… ह्या माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्यावर मित्राचा हळुवार हाथ फिरला…. पाठीवर प्रेमाने थाप पडली… तसा मी शांत झालो. तो पंचाहत्तरीचा कार्यक्रम खास माझ्यासाठी आयोजित केला होता त्यांनी आणि त्यात त्यालाही न्हाऊन निघायचं  होतं. माझ्या आयुष्याच्या मावळत्या काळात पुन्हा नव्या उमेदीने उर्वरित आयुष्य जगायला प्रेरणा देणारे  ते संस्कार अनुभवून खरच मी निःशब्द झालो होतो… माझा कंठ दाटून आला होता… स्वर ओला झाला होता… मनाचा बांध  आता फुटला होता… डोळ्यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली होती… मित्राने आणि त्याच्या कुटुंबीयांनी आमच्या मैत्रीच्या जागेपणाला एक वेगळा आकार देऊन वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते… मी शांतपणे डोळे मिटून  बसलो होतो… जसे संस्कार होत होते तसे माझ्या डोळ्यांसमोर माझी पत्नी उभी ठाकली होती. तिच्याच करकमलांनी माझ्या अंगावर पुष्पवृष्टी होतेय असा भास होत होता… मला तिची ती प्रेमाची उब क्षणाक्षणाला जाणवत होती… त्या पाच दहा मिनिटांत माझा साठ वर्षांचा संसार आठवला…. त्यातले प्रत्येक सुखाचे क्षण आठवले त्यामागच्या प्रेमळ भावनांची अभिव्यक्ती आठवली… महाभारतातल्या भगवान श्रीकृष्णासारखं तिचं आमच्या संसाराचं सारथ्य आठवलं… आणि मी दिपून गेलो.   डोळे उघडले तेव्हा मी भानावर आलो. समोर मित्र आणि माझी वहिनी  होती… मी कृतकृत्य झालो होतो मनात आभार मानत होतो  माझ्यासमोरसाक्षात परमेश्वर म्हणून  उभ्या असलेल्या दाम्पत्याचे.… त्या कुटुंबियाचे आणि हे नातं शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात सिंहाचा वाटा  असलेल्या माझ्या प्रिय पत्नीचे.…
‘मित्रा, मला त्यादिवशी प्रकर्षाने आठवण आली रे तिची. त्या घरात त्या रात्री त्या सगळं आनंददायी वातावरण असूनसुद्धा मला मात्र झोप नाही आली. माझ्या हळव्या मनचक्षुसमोर एक  प्रतिमा  दिसत होती. तो समाधानी चेहरा काहीतरी सांगू पाहत होता… आपल्या मनातलं इंगित माझ्या कानात हळुवार व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होता… माझा ह्या इहलोकीचा कार्यभाग संपलेला आहे…? आता मी परतायला हवं…? इथंला निरोप घेऊन तिच्या कडे जायला हवं…? असं तर तिला सांगायचा नसेल ना ?’ ही वाक्य उच्चारता उच्चारता ते कुलकर्णी काकाचं शरीर गदागदा  हलवून त्यांना  विचारात होते… डोळ्यातील आसवांनी त्या  चेहऱ्याच्या सुराकुत्यांमधून  मार्ग शोधत खाली घरंगळायला एव्हाना सुरुवात केली होती. त्यांच्या त्या थरथरत्या ओठांतून एकच वाक्य बाहेर पडत होते… आज ती असायला हवी होती…. आज ती असायला हवी होती… '
कुलकर्णी काकां त्यांना शांत करत हातात हात घालून, त्यांना घेऊन गेले… पण मी मात्र तिथेच त्या बाकड्यावर बसलो होतो… त्या बागेतील दिव्यांच्या प्रकाशात लुप्त होणाऱ्या त्यांच्या  पाठमोऱ्या आकृतीकडे निश्चल पणे एकटक बघत… रस्त्यांच्या कडेला असलेल्या दिव्यांच्या खांबासारखे, आयुष्याच्या वळणा-वळणावरील सुख-दुःखांचे दिवे न्याहळत…
                         -----x----

दिनांक- 26-12-2013                                                     

Published in Prahar Marathi newspaper

http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=16,1532,2220,2270&id=story5&pageno=http://epaper.eprahaar.in/29062014/Mumbai/Suppl/Page4.jpg



&

http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=18,1638,2228,2266&id=story5&pageno=http://epaper.eprahaar.in/06072014/Mumbai/Suppl/Page4.jpg

निरोप

'श्री अक्षरधन' च्या  'मे २०१५'  च्या विशेषांकामध्ये प्रसिद्ध झालेली पारितोषिक विजेती कथा ---

आयुष्यावर बोलू काही…निरोप     

 संध्याकाळची वेळ.  सारं  आकाश  काळ्या  कभिन्न ढगांनी झाकोळून गेलं होतं.  बाहेरचा  अंधार, सारं आयुष्य दुःखाच्या खाईत  लोटून देत  असल्याचा आभास होत होता.  ढगांचा  कर्णकर्कश   गडगडाट, काळजाची कंपनं वाढवत होता.  वीजांच्या कडकडाटाने धरणी भेगाळून जावी तशी मनोवस्था झाली होती.  घरातील दिवे गेल्याने, देव्हाऱ्यातील मिणमिणत्या  समईचा अंधुक प्रकाश,  उगाचच घरभर पसरण्याचा केविलवाणा  प्रयत्न करत होता.  एव्हाना ढगांच्या रुद्रावताराची जागा, भरधाव वेगाने वाहणाऱ्या  वादळ वाऱ्याने घेतली होती.  तो पिसाटलेला  बेभान वारा  मिळेल त्या जागेतून घरात घुसखोरी करत होता.   दिवाणखान्यातील पडदे वाऱ्याच्या झोताबरोबर चित्र-विचित्र आकार घेत जोरजोरात फडफडत होते.
 वीजांचं तांडवनृत्य  आताशा मुसळधार पावसाच्या सरींमध्ये विरून गेलं होतं.  धो-धो कोसळणारा पाऊस, हळू हळू शांSSSत झाला होता.  आता आमच्या सोबतीला होती फक्त निरव शांतता...सर्वांग जाळून टाकणारी  शांतता...

आज  माझी, परीक्षा होती म्हणण्यापेक्षा, सत्व परीक्षा होती. गेले पाच महिने, अमृत समजून विष पचविण्याची ताकद येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आलो होतो.  ‘ज्या जर्जर आजाराने अन असह्य वेदनेने  तिला अंथारुणावर  खिळून पडावं लागलं होतं, तो आजार म्हणजे  न मागता मिळालेलं दुःखाचं महा संकट होतं. ती पूर्व जन्मातील केलेल्या कर्माची फळं होती की  तो अभिशाप होता ? काहीच कळायला मार्ग नव्हता. पण एक मात्र खरं,  तिचं आयुष्यं, आज मरणाच्या उंबरठ्यावर उभे राहून जगण्याची अपेक्षा करत होतं.  सहस्त्र योनीतून मिळालेला  मानवाचा जन्म,  कसल्याही प्रकारचं ऐश्वर्य न उपभोगता परतीच्या मार्गाला लागला होता. जन्म जन्मांतरीचा प्रवास अखेरच्या श्वासात अडकलेला जाणवत होता मला… ज्या वयात सामाजिक, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या,  त्याच्या आतच, त्या शरीराला, अगदी न पेलवणाऱ्या कष्टी मनाने,  कर्मभूमीचा निरोप घ्यावा लागणार होता... नियतीनं अगदी निश्चित केलं होतं ते... आणि या साऱ्याची पुसटशीसुद्धा कल्पना नसल्याने, आपल्या आयुष्यावर आलेलं छोटंसं मळभ समजून, ते निर्विकारपणे सावकाश दूर सारण्याचा प्रयत्न करत होती;  पुन्हा  नव्या उमेदीने आयुष्य जगता येईल ह्या विश्वासाने,  आकाशात नजर खिळवून विधात्याकडे पाहात, आशेच्या पायरीवर उभी होती… 

आज मी ठरवलंच होतं.  मनावर दगड ठेऊन... तिला विश्वासात घेऊन सssगळं  काही सांगायचं.  'हे फुलासारखं कोमल आयुष्य काही काळाने कोमेजून जाणार... विधात्याने आखून दिलेल्या चौकटीतच ते फिरत राहणार... वेळप्रसंगी नियतीच्या हातातलं बाहुलं  बनणार... ज्या मातीत जन्म घेतला त्याच मातीत आपलं हे शरीर विलीन होणार... हा जीवन प्रवास कुणालाच चुकलेला नाही. दस्तुरखुद्द परमेश्वरालाही हा फेरा चुकविता आला नाही. मग आपण तर मनुष्यप्राणी.  नियतीच्या हातातल्या कठ्पुतल्या !’

आम्ही एकमेकांच्या खूप जवळ बसलो होतो आज. गेले पाच महिने आम्हाला तसा एकांत मिळालाच नव्हता. चार प्रेमाचे शब्द व्यक्त करायला,  त्याचा आनंद घ्यायला उसंतच मिळाली नव्हती. सारा वेळ दवाखाने...वैद्यकीय चाचण्या... हॉस्पिटल्स... औषधोपचार... यातच व्यतीत होत होता. आणि म्हणूनच आज घरातील सगळ्या मंडळींना नातेवाईकांच्या घरी पूजेनिमित्त पाठविले होते. कारण एकच होतं...प्राणप्रिय व्यक्तीला आज जे काही सांगायचं होतं, ते सगळ्यांसमोर व्यक्त करण्याचं धाडस नसतं झालं. निष्पाप मुलींना, त्यांच्या बालमनावर परिणाम होईल अशी,  गंभीर  आयुष्याची करूण कहाणी ऐकवायची नव्हती. जगण्याचा अर्थ समजण्याअगोदरच, मृत्यूबाबतचं  महाभयावह  चित्र त्यांच्या नजरेसमोर उभं करायचं नव्हतं... आज मनमुराद प्रेमाच्या  गप्पा  मारायच्या होत्या... ते करता करताच आयुष्यावर बोलायचे होते...

परंतु  दिवाणखान्यातील ती भयाण शांतता तोंडातून शब्द बाहेर  काढायला मज्जाव करत होती. माझ्या मांडीवर डोकं ठेवून, निर्विकार चेहऱ्याने  ती श्रांत पडली होती. तिच्या  मनात कोणतं विचारचक्र चालू आहे हे मात्र मला कळत नव्हतं. हरेक प्रकारच्या उपचाराने  हैराण झालेली असताना, शरीरावर  औषधांचे  झालेले   दुष्परिणाम दिसत असतानासुद्धा, सात वर्षांपूर्वीचं एक बिन्धास्त व्यक्तिमत्व दिसत होतं ते.. माझं स्वत्व विसरायला लावणारे  तिच्या डोळ्यातील भाव, मला भूतकाळातील आठवणींच्या हिंदोळ्यावर घेऊन गेले......
‘ते कॉलेजचे दिवस होते… माझ्या आयुष्याची परवड आता कुठे थांबली होती. अर्ध्यावरती सोडलेला शिक्षणाचा डाव, पुन्हा ह्या नव्या शहरात  मांडला होता. शासकीय सेवेत नोकरी मिळाली तरी पुढे शिकण्याची उमेद होती. आयुष्यात सतत कोणत्या न कोणत्या कामात व्यस्त राहायची सवय असल्यामुळेच पदव्युत्तर शिक्षणासाठी, ‘मराठी साहित्य’  विषय घेऊन  अभ्यास सुरु केला.  विधात्याने  ठरवलेल्या सगळ्या गोष्टीं अगदी जश्याच्या तश्याच  होत असतात.  दरम्यानच्या काळात, सामाजिक, कौटुंबिक प्रश्नांच्या व्यथेने अस्वस्थ झालेलं मन एका जागेवर स्थिर होत नव्हतं. कदाचित ते वयच तसं  असावं. गरज होती व्याकूळ मनाला शांत होण्याची… मानसिक आधाराची….  त्यासाठी हवी होती हक्काची व्यक्ती. समजणारी… समजून घेणारी…  मनाचा समतोल सांभाळणारी… मायेचा आधार देणारी… ती आर्त साद विधात्याने ऐकली होती.  माझ्याच कार्यालयात तात्पुरत्या काळाच्या  नोकरीसाठी तिची निवड झाली. अगदी थोड्याच कालावधीत  आमचा परिचय झाला.  कार्यालयातील महिला सहकाऱ्यानेच आमचा परिचय करून दिला होता… निमित्त झालं  'मराठी साहित्य' ! शिक्षणाचा प्रवास सुरु होता. सोबत मिळाली… मार्गदर्शन वजा सहकार्य मिळालं… सूर जुळले… भरकटलेले मन, एक चांगली जागा  मिळाल्याचं समाधान मानून,  विसावू  पाहात होतं…

आयुष्यातल्या स्वप्नपूर्तीचा तो दिवस होता…  आम्ही सारासार विचार करुन निर्णय घेतला.   काही प्रमाणात सामाजिक बंधनं झुगारून, एका नव्या विश्वात आयुष्य जगायच्या आणाभाका खाल्ल्या.   संकुचित विचारांची चौकट तोडून आमच्या प्रेमाच्या नात्याला विवाह बंधनात गुंफून टाकलं. उज्वल आयुष्याची वाटचाल आम्ही सप्तपदीने सुरु केली. घरच्या मंडळींचा रोष पत्करून,  सारं काही सोडून जीवन जगण्याची हमी देत ती माझ्यासोबत सहचारिणी बनून आली होती.  तिचा तो समंजस, प्रेमळ, मनमिळाऊ स्वभावच मला आजचं जग दाखवू शकला... भौतिक परिस्थितीवर मात  करून गेला...आमच्या प्रेमाला अखंड आयुष्याच्या बंधनात बांधून गेला... सुखी संसाराची साकार होणारी स्वप्नं  दाखवून  गेला... अस्थिर मनाला एक भक्कम कोंदण मिळाळं  होतं, तर व्यथेला, दुःख हलकं  करायला एक कूस मिळाली होती.  स्त्रीचं मन हे किती उदात्त असतं ! सर्वसमावेशक ! त्याला सागराची गहराई असते... आकाशाची उंची असते... अंतराळाची  व्यापकता असते... किती क्षम्य... क्रियाशील... उदयोन्मुख... विशाल... ह्या साऱ्यामुळेच आमच्या संसाराची घडी चांगली बसली. सुख-दुःखाच्या समयी एकमेकांना साथ देत, सुखी संसाराचा गाडा अगदी सुरळीतपणे चालला होता. आमच्या प्रेमाच्या पाउलखुणा... दोन कन्या ! त्यांचं बालपण... संगोपन... सगळं  कसं  सुखात चाललं होतं. दृष्ट लागावा असा संसार चालला होता आमचा.

 पण काट्याविना फूल नाही...दुःखाविना संसार  नाही... तद्वतच, आमच्या संसाराला  ग्रहण लागलं. अंगावर काढलेला, तो साधा वाटणारा खोकला, क्षयरोगामध्ये प्रणीत झाला होता. अगदी महिनाभराच्या कालावधीत, त्यावरील औषधांना साथ न देता  तो ‘एमडीआर टी बी’ म्हणून  शरीरामध्ये घट्ट पाय रोवून बसला. औषधांचा हवा तसा परिणाम दिसून येत नव्हता.  खालावत चाललेली शरीर  प्रकृती,  रोगाचं   निदान योग्य  रीतीने झालं नसल्याच स्पष्ट करत होती. आता आम्ही बायप्सी करण्याचा निर्णय घेतला.  बायप्सी करताना ऑपरेशन थियटर मध्ये डॉक्टरांनी जे चित्र दाखवलं त्याने बेशुद्धावस्थेत गेलो. अंधाराचा महाभयानक राक्षस  डोळ्यांसमोर दत्त म्हणू उभा राहिला होता.  एका धास्तीने मन पोखरून टाकलं होतं. सर्व कुटुंबियांनाच रिपोर्टची प्रतीक्षा  लागली होती. रिपोर्ट निगेटिव्ह यावा म्हणून ते सात दिवस परमेश्वराच्या याचनेतच गेले. तो दिवस अजूनही अंगावर शहारे आणतोय. त्या रिपोर्ट मधले 'फास्ट ग्रोविंग लंग कार्सिनोमा-३-बी स्टेज- (फुफुसाचा कर्करोग)' हे शब्द काळजाला भोक पाडून आरपार मेंदूत गेले.  मी कोसळलो…  डोळ्यांसमोर गडद अंधार... समोरचं  काहीच दिसेनासं झालं होतं. मला स्वतःला सावरणं  अशक्य झालं.  भावनेचे बांध तुटले… हंबरडा फुटला… धाय मोकलून लहान बाळासारखा रडत होतो…त्याच जागेवर….एकटाच… डोळ्यांतून ओघळलेले  अश्रू, माझ्या थंड पडलेल्या गालावरून खाली घसरून त्या रिपोर्टवर पडत होते. मला भानच उरलं नव्हतं कशाचं.   तिचे भाऊ, बहिण, नातेवाईक… सारेजण मला शांत  करत होते… धीर देत होते... त्या आर्जवांना न जुमानणारा माझा आक्रोश अखंsssड चालू होता… आजाराच्या  अजस्त्र अजगराने तिच्या आयुष्यालाच  विळखा घातला होता, कधीही न सुटणारा… त्या असह्य वेदना, थेट काळीज कापून रक्तबंबाळ करत होत्या… मृत्यूची घंटा वाजली  होती. आता फक्त मानसिक सामर्थ्यावर जिवंत राहण्याचा प्रयत्न करायचा होता… मानसिक धैर्यच आता कामी येणार होतं. औषधांची मात्रा कितपत लागू होईल याची खात्री बाळगता येत नव्हती…

 विज्ञान कितीही पुढे  गेलं असलं  तरी निसर्गाच्या स्पर्धेत मात्र ते मागच राहतं… नियतीबरोबरच्या खेळात त्याची हारच होते…  निसर्ग आणि नियती ह्यांच्यातील ही  अहमहमिका अशीच अव्याहत  चालू राहणार… हे जरी सत्य असलं तरी, सारच नियतीवर सोडून चालणार नव्हतं. मृत्युच्या जबड्यातून बाहेर काढायची ताकद  मात्र विज्ञानामध्येच आहे, हाच एक आशाभाव उराशी बाळगून उपचार सुरु केले.

ह्या आजाराची कल्पना येऊ नये म्हणून खाजगी इस्पितळ गाठलं, तेही  ‘टाटा  हॉस्पिटल’ मधील डॉक्टरांचा सल्ला  घेऊनच. सगळेच हतबल… हताssश झालो होतो.   महागड्या  आजाराचे  महागडे उपचार… स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी जेवढी कुतरओढ करावी लागली नाही, त्याच्या कितीतरी पटीने मला पैशासाठी वणवण भटकावं लागत होतं. पैशाचं सोंग करता येत नव्हतं.  नातेवाईकांनी सर्वोतोपरी आपापली कर्तव्य बजावली होती. संकटकाळीच माणसाचा खरा चेहरा समोर येत असतो. माणसाला शहाणपण शिकवून जाणारा खरा कोण असेल तर स्वतःवर ओढवलेला कठीण प्रसंग… तो जगाकडे  एका वेगळ्या नजरीयाने बघायला लावतो… ह्या अडचणीत मला,  जवळचे, दूरचे, आप्तेष्ट, नातेवाईक,  मित्र परिवार …सगळेच आपले वाटू लागले. मी संपलो होतो… माझं  हळवं मन जखमी झालं होतं… हवालदिल होऊन निपचित पडलं होतं. त्या  कठीण समयी सर्वांकडून आधार मिळाला म्हणूनच,  पांच महिन्यानंतरही तिची आज सोबत होती.  त्या जीवघेण्या प्रसंगी मी एकटा खूप कमी पडत होतो. तरीही माझी जबाबदारी मला स्वस्थ बसू देत नव्हती. जिथे जिथे म्हणून मदतीसाठी फिरलो तिथे तिथे देवासारखी माणसं भेटली. सगळ्यांचे आभार मानत गेलो… कृतज्ञता व्यक्त करत गेलो… तरीही त्यांच्या उपकाराची परतफेड होणं ह्या जन्मी तरी  अशक्य आहे. कारण जे पांच महिने मला तिचा सहवास   मिळाला,  ते  बोनस लाइफ  होतं आणि म्हणूनच मी आजही त्या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. ते लोक देवच होते माझ्यासाठी, माझ्या कुटुंबियांसाठी… ज्या संबंधित व्यक्तींच्या वाचनात हे येईल, कदाचित ते अचंबित होतील…

एका गोष्टीचा अजूनही उलगडा नाही झाला… जर पृथ्वीतलावरील माणसं देव बनून मदतीला धावून आली होती तर, आस्तिक म्हणून   तिने आयुष्यभर ज्याची भक्ती केली,  पूजापाठ केले,  उपासना केली,  त्याचा  मनोभावे केलेला धावा, त्या परमेश्वराच्या कानापर्यंत, हृदयापर्यंत  का पोहोचत नव्हता ??? तिची आSSर्त साद त्याला का ऐकायला येत नव्हती ??? तो दगडाच्या काळजाचा का झाला होता ??? तो इतका  संवेदनशुन्य  का झाला होता ???  आपल्या संसाराची घडी नीट बसावी म्हणून दिवस रात्र काबाडकष्ट करत जीवन प्रवास सुरु होता...  दोन कन्या आणि त्यांचं उज्वल भवितव्यही  एक मोठी  कौटुंबिक  जबाबदारी होती.  आपल्या डोळ्यादेखत स्थिरस्थावर झालेली मुलं, त्यांचा सुखी संसार, अगदी सामान्य माणसाच्या सरळ  आणि  साध्या अपेक्षेप्रमाणे,  आपली नातवंडं पाहण्याची आशाच, एक जिद्द बनून, त्या महाभंकर आजाराशी दोन हात करत होती.  त्या वैद्यकीय उपचारादरम्यान खूप शारीरिक हाल सोसावे लागत होते तिला.   औषधांचे सामर्थ्य, शरीरावर दुष्परिणामांच्या खुणा ठेवून जात होते…

तिने माझा एक हात दोन्ही  हातात घट्ट पकडला होता.  तो स्पर्श मनाचा मनाचा ठाव घेत होता.  अबोल झालेले  शब्द, काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. तिला बोलतं  करायचा होतं. तिच्या शरीरातील  त्या दाहक औषधांबरोबरच,  तिच्या मनात चक्रीवादळासारखे  थैमान  घालत असलेले विचार शमवायचे होते. त्याला वाट मोकळी  करून द्यायची होती. त्या  विचारांच्या, इच्छा-आकांशांच्या परडीतील फुले  मला हळुवारपणे  वेचायची होती. त्यातल्या पाकळ्या-न-पाकळ्या उलगडून समजावून घ्यायच्या होत्या. काही आस-इच्छा व्यक्त करायच्या असतील, काही  अभिवचनं घ्यायची असतील तर तीही जाणून घ्यायची होती. अर्ध्यावरती सोडणार असलेला डाव पूर्ण करायचा होता मला… खरंतर ती आमची सामायिक जबाबदारी होती, परंतु आता मात्र ती मला एकट्याला पार पडायची होती.  ते  विचार   हळुवार स्वीकारण्यासाठी माझा हात प्रेमळपणे डोक्यावरून फिरला अन धस्स झाले... हाताला केसांचा स्पर्श झाला नाही. ओकं-बोकं झालेलं डोकं, उजाड भविष्याची सगळी कल्पना देऊन गेलं… ती सुकेशिनी होती...  उपचाराने मात्र  तिच्या डोक्यावरील केस गळून पडले होते. तिचा सुजलेला चेहरा बरंच काही सांगून जात होता…

माझा प्रयत्न होता, दिवाणखान्यातील त्या भयाण शांततेला खिंडार पाडायचं… माझा तो भावस्पर्शी हात हळुवारपणे तिच्या डोळ्यांवरून खाली घसरला.  माझ्या बोटांना उष्ण जलधारांची धग लागली… तिच्या डोळ्यातील मोती, एक एक करत घरंगळून खाली पडत होते… ते मोती नाजुकशा हातांनी टिपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो मी. त्या आसवांच्या पुरामध्ये  माझं सर्वस्व वाहून जात असल्याचं चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभं होतं… मन दगडासारखं घट्ट करुन बोलू लागलो…

 ‘प्रिये, तुला माहित आहे ? आज पाच महिने झाले तुझ्यावर औषधोपचार चालू आहेत.  कोणता आजार झाला असावा तुला ? ज्यावेळेस अशा प्रकारची ट्रीटमेंट एखाद्या रुग्णाला दिली जाते, त्यावेळेस तो नक्की आजार कोणता ही  एक अनामिक हुरहूर तथा जिज्ञासा असते जाणून घेण्याची… मग असं  कधीच का वाटला नाही तुला ? मी मान्य करतो की  मी तुझ्याशी खूप खोटं बोललो, तुला, आजाराची कल्पना नाही दिली. मी जे काही सांगत गेलो  त्यावर पूर्ण विश्वास ठेवत गेलीस . सप्तपदी घालताना घेतलेल्या त्या शपथा… दिलेली ग्वाही… मिळालेला विश्वास…तंतोतंत पाळलास, मला कोणत्याही प्रकारची जाणीव होऊ  न देता…  अलीकडच्या  कालावधीत जे जे सोसत होतो, सहन करत होतो, भोगत होतो,  ते कुठेतरी व्यक्त करायचं  होतं मला. पण ते तसं करू शकत नव्हतो. मी माझ्या भावनांचे अश्रू, आपल्या पिल्लांसमोर ढाळू शकत नव्हतो. त्या अश्रूंना तुझ्यासामोरही अभिव्यक्त होण्याचं धाडस होत नव्हतं. खरं तर यापूर्वीच  मी तुला हे सारं सांगायला हवं होतं. तुला अंधारात ठेऊन हे सारं करायची धडपड यासाठीच होती की, त्या आजाराची कल्पना जर तुला आली असती तर तू मानसिकदृष्ट्या खचून जावून, त्यावरील उपचाराला योग्य तसा प्रतिसाद मिळाला नसता. आणि मग त्या महाविध्वंसक  आजाराने तुझं अस्तित्व, वादळ वाऱ्याच्या वेगाने गिळंकृत करून टाकलं असतं.  आपली प्रतीकं… ज्यांना अंधाराचा स्पर्श नाही… दुःखाची चाहूल नाही… ज्यांच्यावर ग्रहांची  वक्र दृष्टी नाही, त्यांना ह्या करुण कहाणीची बिलकुल झळ पोहोचू नये हीच आर्त आणि प्रामाणिक इच्छा होती. एवढ्या कोवळ्या वयात, जिथं आयुष्याची स्वप्नं भातुकलीच्या खेळातून साकार करायची असतात, तिथं उद्ध्वस्त होणाऱ्या जीवनाचं चित्र दाखवायचं माझ्या हातून पाप घडू नये ही  काळजी घेत होतो.’

मी सारं सारं काही कबूल करत होतो. तिच्या कोर्टात साक्षीदाराच्या पिंजऱ्यात   उभा राहून मी कन्फेसर ची भूमिका पार पडत होतो. आता पर्याय उरला नव्हता... मी बोलत राहिलो, 'त्या आजाराच्या  पहिल्या कल्पनेनंच   माझं शारीरिक संतुलन बिघडल्याचं परोपरी जाणवत होतं. त्या मानसिक धक्क्याने माझा आवाज गेला. आयुष्य हे एका उजाड माळरानासारखे वाटू लागले… डोळ्यांना सुखावणारा एकही हिरवा क्षण दृष्टीपथास पडत नव्हता... घरातल्या कठीण प्रसंगांना तोंड देत असतानाच, आवाज नसल्यामुळे घराबाहेरही तोंड देता देता नाकी नऊ आले. एक सांगू  प्रिये ? एक माता म्हणून तुझ्या   जबाबदाऱ्या तशाच असताना, हतबल होऊन तुला अंथरुणावर खिळून पडावं लागलं आहे, हीच जाणीव मनाला सारखी बोचत राहिली आहे…’ तिच्या निर्विकार चेहऱ्यावर कसल्याच खुणा दिसत नव्हत्या. आजाराचं गांभीर्य कदाचित तिला समजलं असावं. तो कर्दन काळ तिने स्वतः बघितला आहे, सोसला आहे. हे जाणूनच मी पुढे सांगायचं धाडस केलं…

 'तू क्षयरोगाची शिकार झाली आहेस. त्याने तुझ्या आयुष्याला विळखा घातला आहे… कधीही न सुटणारा… प्रिये,  हा आजार मला का नाही दिला देवाने? मी तर तो सहज स्वीकारला असता...  सुखी संसारात  त्यागाची भावना असायला हवी… तर मग तो त्याग एकट्यानेच का करायचा? तुझ्यासाठी मी माझ्या जीवनाचा त्याग केला असता... तुझी अर्धवट राहिलेली मातृत्वाची कर्तव्य पूर्ण करायला तुला दीर्घ आयुष्याचं देणं लाभलं पाहिजे ना ? मग त्यासाठी माझं उर्वरित आयुष्य तुला दिला असतं… विधात्याला तसं साकडं घातलं असतं… पण हे असं का नाही झालं ? माझ्या  कुठल्या पापाची फळं, तुला भोगावी लागत आहेत ? प्रिये… नियतीचा हा खेळच विचित्र आहे… जो सर्वांना आवडतो ना, तोच....तोच देवाला आवडतो… तू  तुझ्या स्वभावामुळे सगळयांच्या गळ्यातील ताईत  झाली होतीस, सगळ्यांची प्रिय होतीस ना ? तोच धागा त्याने पकडला आणि त्या धाग्याचा गळफास होऊन आयुष्याभोवती घट्ट होत गेला.  सर्वसामान्य माणसाचं आयुर्मानसुद्धा तुला लाभू नये,  हे कुठल्या करंट्या नशिबाचे भोग आहेत ? जीवनभर साथ देण्याची शपथ मोडली जातेय याचं दूषण मी तुला नाही देत... त्याचं खापर माझ्यावर घ्यावं म्हटलं तर तसं कारणही दिसत नव्हतं. मग दोष द्यायचा कुणाला ? सुखी संसारात ज्याने विष कालवलं… त्याचा राग राग का होणार नाही ? त्यालाच जबाबदार  का धरलं जाणार नाही ? त्याच्यावर विश्वास कसा राहणार ? मग प्रश्न पडतो तो ह्या पृथ्वीतलावर परमेश्वर नावाचं  अभिधान लाभलेलं खरंच काय आहे का ? संकट समयी ज्याचा  धावा केला जातो, तो आहे कुठे ? तो तुझ्या हाकेला धावून का आला नाही ??? कर्ता करविता तोच… निमित्त मात्र आजाराचं…’

ती तशीच श्रांत, निश्चल होती. हे सारं एखाद्या लहान मुलासारखं एकाग्र होऊन ऐकत होती. मी मात्र भडभडा ओकत गेलो… मनातील व्यथा मांडत गेलो… वास्तव जीवनाचं भयाण स्वरूप तिच्यासमोर रेखाटत गेलो…  मला हेही कळून चुकलं  होतं, यापुढील  आयुष्याच्या प्रवासात तिची साथ नसणार आहे… दोघांनी मिळून सुरु केलेला प्रवास तिच्याविनाच गन्तव्यस्थानापर्यंत नेटाने न्यावा लागणार आहे… तो समोर असलेल्या दोन प्रतीकांच्या  उज्वल भवितव्यासाठी… तिचं  क्षीण होत चाललेलं शरीर आणि निस्तेज पडत चाललेला चेहरा,  भयावह रात्रीची चाहूल करून देत होता… माझं हे कथन तिच्या पचनी पडत होतं, असं दिवाणखान्यातील शांततेमुळे मला जाणवत होतं… तिला काही तरी सांगायचं  होतं… ती उठू पाहत होती पण शरीर जड झालं असल्याने  शक्य नव्हतं. तिने हातात धरलेला माझा हात अधिकच घट्ट होत गेला…
 ती बोलू लागली, ' मला सारं समजलंय… उमजलंय… सगळ्याची जाणीव झालीय… काहीही झालं  तरी दैवाचा फेरा मलाही नाही चुकविता  येणार… जन्म घेतला म्हणजे मृत्यू अटळ ! मी एका मोठ्या सामायिक जबाबदारीचं  ओझं तुझ्या खांद्यावर ठेऊन जाणार आहे… माझी अपुरी कर्तव्य,  जबाबदाऱ्या, एका आईची भूमिका साकारून पार पाडायची आहेत तुला… आपल्या पिल्लांना मोठं करायचं आहे खूssप मोठं करायचं आहे… त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं आहे… त्यांचा सुखी संसार मला वरून पाहायचा आहे…त्यांना, सुखी जीवनाचा आनंद घेताना पाहिल्यावरच, माझ्या आत्म्याला शांती मिळेल. मी इथेच असेन… तुझ्या शेजारी… तुझ्या भोवताली... तुला कोणत्याही प्रकारची अडचण नाही येणार. तसं झालंच तर मला आठव…आपल्या निर्मळ  प्रेमाला  आठव… आपला जीवनप्रवास आठव…आपलं ध्येय आठव… सोन्या, मी जरी ह्या विश्वात नसले प्रत्यक्ष तुझ्या समोर नसले तरी आपल्या ह्या दोन कन्या मध्ये तू मला बघ. मी त्यांच्यात आहे. आत्तापर्यंत जशी माझी काळजी घेतलीस तशी त्यांची काळजी घे. ती माझीच सेवा केल्यासारखी असेल… ते तुझं आद्य कर्तव्य समजायला हवंस…’

हे सारं मनोगत, तिची आर्जवं माझ्या काळजाला घरे पाडत होती.  संध्याकाळच्या भयाणतेणे महाकाय स्वरूप धारण केले होते.  देव्हाऱ्यातील दिवा मघासारखाच मिणमिणत होता- मात्र तेजहीन! नियतीच्या मनात मात्र  निराळेच होते. ह्या गंभीर परिस्थितीत आम्ही एकमेकांना समजावत होतो. ती भयाण  शांतता... काळ म्हणून समोर उभी होती. दिवाणखान्यात आम्ही दोघे असताना सुद्धा अंधकाराचं साम्राज्य पसरलं होतं. माझ्या दाटून आलेल्या कंठातून शब्दांना बाहेर यायला जागाच नव्हती… शब्दांची जागा डोळ्यांनी  घेतली होती. माझे डोळे बोलू लागले होते…  ‘जन्म-जन्मांतरीची नाती अशी अचानक आणि सहज तुटण्यासारखी  नाजूक का केलीत विधात्याने?’  ह्या न सुटणाऱ्या कोड्याने माझ्या डोळ्यांतून, माझ्या नकळत ओघळलेल्या आसवांची फुले, त्या निस्तेज भालप्रदेशावर हळुवार अलगद उतरत  होती…. 
ती गत आयुष्याची उजळणी होती ?…  तो अखेरचा सहवास होता ?… ती अखेरची भेट होती ?…ती जन्म-जन्मांतरीच्या सहचारिणीसाठी याचना होती ?…. की आयुष्याचा खेळ संपण्यापूर्वीच वाहिलेली श्रद्धांजली होती ती…???

                                              xxxxxx
दिनांक- 09-10-2013               

मानवतेचे मंदिर…

मानवतेचे मंदिर…

                सामाजिक जाणिवेची पाळंमुळं, खरं तर माणुसकीत लपलेली असतात. आपल्या भोवतालची कौटुंबिक, सामाजिक विषमता, अशा माणुसकी जपलेल्या सुहृदय माणसाला स्वस्थ बसू देत नाही. बसू देत नाही म्हणण्यापेक्षा झोपू देत नाही. ज्या समाजात आपण जगत आहोत, तिथे सामाजिक बांधिलकी म्हणून त्या समाजाचे प्रति एक परीने आपलं काही देणं लागतं...  ह्या आणि अशाच जाणीवेतून उदयास आलेला एक संगीतमय गट म्हणजे स्वरगंधार!!!
                ह्या संस्थेने आयोजित केलेल्या संगीतमय महफिलीचा एक सहभागी घटक म्हणून बदलापूर येथील  ‘आधार’ संस्थेस भेट देण्याचा योग आला. खरं तर, ह्या उपक्रमात माझा सहभाग तसा अचानक झाला.  कारण होतं… मला असलेली संगीताची आणि गायनाची आवड.  उद्देश तसा दुहेरी !!!  म्हणजे आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळते आहे आणि त्यातूनच काही अंशी समाजसेवा साधली जातेय!!!
                पहाटे उठून महाफिलीच्या सर्व जय्यत तयारीनिशी आम्ही ठाण्यावरून सकाळी ९ वाजता बदलापूरच्या दिशेने प्रस्थान केले.  जवळपास दहा वाजता आम्ही त्या निसर्गरम्य परिसरात पोहोचलो. गाडीतून उतरतानाच प्रत्येकजण चक्क आपलं सगळं सामान घेऊनच सभागृहात पोहोचला. तसा थोडासा उशीरच झाला होता आम्हाला तिथे पोहोचायला. त्यामुळे आम्ही लगेच व्यासपीठाचा ताबा घेऊन सामान लावायला सुरुवात केली. व्यवस्थापनाशी अगोदरच बोलणं झालं असल्याने त्यात पुन्हा वेळ दवडला नाही.  मध्येच लगबगीने नाश्ता-चहापान झाला अन ताजे-तवाने होऊन तयारी पूर्ण केली.  कार्यक्रमास सुरुवात अर्थात माझ्याकडूनच झाली. कारण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती.  
                माझ्या समोर येऊन बसलेला श्रोतावर्ग कसा असेल ह्या उत्सुकतेत होतो मी. दोन-चार मुलं सोडली तर सारेचजण कसे शांत बसले होते खाली टाकलेल्या सतरंज्यावर !!!  एक दोघेजण मधूनच आपला हात उंचावून मला नमस्कार करत होते. त्यातले एक वयस्क गृहस्थ माझ्याशी हात मिळवून निघून गेले.  पूर्ण सभागृह लाल रंगाच्या टी-शर्ट मधील मुलांनी आणि वयस्क लोकांनी तसेच मुलींनी तुडुंब भरून गेलं होतं. आमच्या कार्यक्रमाला अशा पद्धतीने असलेली उपस्थिती पाहून मी अचंबित अन आनंदीतही झालो. सुरमयी सकाळला सुरुवात झाली. पहिली दोन-तीन गाणी संपल्यानंतर, श्रोत्यांच्या शारीरिक हालचालींना वेग येऊ लागला. हे सारं मी अगदी निरखून बघत होतो. सभागृहातील तो श्रोता वर्ग व  त्यांची शारीरिक जडणघडण बघून, एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणविली ती- त्या सगळ्यांची शारीरिक घडण सर्वसामान्य माणसासारखी नव्हती. वयोवृद्ध चेहऱ्यावरसुद्धा निरागसता दिसून येत होती. त्या संगीतमय सकाळचं फलित, पूर्ण प्रहर संगीताला वेड्या झालेल्या श्रोता वर्गावरच्या आनंदावरच अवलंबून होतं.
                रविवारच्या त्या सकाळला खरी दाद मिळाली ती, त्या श्रोत्यांकडून, ज्यांच्या आयुष्यात, जग रहाटीप्रमाणे सामान्य माणसाचं आयुष्य जगण्यासाठी सामान्यपणे असलेले तीन प्रहर नव्हते.  कार्यक्रम चालू असताना गाण्याच्या तालावर थिरकत असलेलली त्यांची पावलं अन सळसळणाऱ्या विजेची अंगात संचारलेली चेतना, त्यांना पूर्ण सभागृह नाचायला लावत होती. सलग दीड ते दोन तास ती मुलं शरीराच्या मुक्त हलाचाली करत आनंदाने बेदुंध नाचत होती. ‘कधी नव्हे ते मिळाले साथी, अंतरंगातून सारे गाती !!!’  ह्या उक्तीप्रमाणे सारेचजण आनंदोत्सव साजरा करत होते.
                कार्यक्रम आटोपला. तिथल्या कर्मचारी वृन्दासह सारेजण समाधानी चेहऱ्याने आपापल्या  खोल्यांकडे जायला निघाले.  ती वेळ खरं तर सगळ्यांच्याच जेवणाची.  पण आमच्या दृष्टीने "पोटोबा पेक्षा विठोबा महत्वाचा !!!"  एवढा सगळा पसारा सांभाळणारी आणि त्या मुलांची माता -पित्याप्रमाणे काळजी घेणारी ती संस्था म्हणजे  विठू माऊलीच होती. म्हणून आम्ही मुलांसाठी नेलेला खाऊ सोबत घेऊन व्यवस्थापकांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो.
                साधे दालन. उजव्या बाजूला भिंडीवर संस्थापकांची तसवीर.  टेबलच्या डाव्या बाजूच्या आलमारीवर  कागदी पिशव्यात काहीतरी ऐवज भरून एक रांगेत ठेवलेल्या दिसल्या. त्या पिशव्यांनी आमचं लक्ष वेधून घेतला होतं. कोरीव काम केलेल्या त्या पिशव्या, व्यवस्थापकांनी एक एक  करत आम्हाला भेट वस्तू म्हणून हातात  ठेवल्या ते हे सांगत, " ह्या वस्तू  बाहेरून विकत आणल्या नाहीयेत तर  इथेच मुलांनी बनविल्या आहेत. "
मनात विचार आला -आम्हीच काहीतरी इथे द्यायला आलोय तर मग आपण काय न्यायचं इथून. ती भेट म्हणजे त्या मुलांच्या मेहनतीचं अन कलेचं कौतुक होतं!!! 
                श्री. पटवर्धन यांच्याशी परिचय झाला अन ते संस्थेविषयी बोलू लागले,  “पूर्वी ह्या जागेवर काहीही नव्हतं. मोकळी जमीन. ११ लाख रुपये देऊन ही जमीन घेतली.  ह्या मोकळ्या जागेवर,   समाजातील मतीमंद मुलांच्या संगोपनासाठी अन अशा प्रकारच्या पालकत्वाने व्यथित, हतबल झालेल्या पालकांची मातृ-पितृत्वाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दि. १७ जानेवारी १९९४ रोजी असा पद्धतीचा प्रकल्प सुरु केला. पकल्प सुरु झाल्याच्या तीन महिन्यात संस्थेतील मुलांची संख्या ७० वर गेली.”
                ती संस्था विश्वस्थ मंडळ स्थापन करूनच चालविली जाते.  खुद्द काही विश्वस्थ मंडळींची मुलं इथे आहेत. 'ना नफा ना तोटा' ह्या तत्वावर चालविली जाणारी संस्था, शासनाकडून कोणत्याच प्रकारचं अर्थ साहाय्य घेत नाहीय. त्यामुळे शासनाकडून कसलाच त्रास नाही ह्याचं खूप समाधान दिसलं त्यांच्या चेहऱ्यावर.  संबंधित पालकांकडून मिळणारा देखभाल खर्च आणि देणग्या ह्यावरंच हा सारा डोलारा गेली बावीस वर्ष उभा आहे.  
                संस्थेची प्रेवेशाची प्राथमिक अट एकच- पाल्य मतीमंद असावं. मग त्यात नानाविध असमर्थता असल्या तरी चालतील. आज मितीस संस्थेत २०० मुलांची क्षमता आहे. त्यातील १५५ मुलं आहेत तर ४५ मुली आहेत.  आणि हा भला मोठा दोनशे मुलांना उभं करण्यासाठी भक्कम आधार आहे तो संस्थेत कार्यरत असलेल्या १४० कर्मचारी वर्गाचा. म्हणजे जवळपास एकास एक अशा प्रकारचे सेवेचे गुणोत्तर, इतर कोणत्याही संस्थेत क्वतीतच बघावयास मिळेल.  
                ‘समाजातील मध्यमवर्गीय घटकांची निकड जाणून घेऊन अशा प्रकारची सेवा देणारी आणि भारतातील निवडक संस्थामध्ये तिची गणना होते’ असं श्री. पटवर्धन सांगत होते.
                त्यांच्याकडे केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर दिल्ली, बंगळूर, कलकत्ता इत्यादी ठिकाणाहून, आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी संपर्क केला जातोय. कारण त्या शहरामध्ये अशा प्रकारचा एखादा प्रकल्प राबविला जाऊ शकतो ह्यादृष्टीने कुठे विचारच झालेला दिसून येत नाही.      
                आमची स्वरगंधार संस्था, खारुताईच्या अंगावरून वाहून नेत असलेल्या मदतीपैकी केवळ १० टक्के मातीचे योगदान देण्याचा प्रयत्न करतेय, तर 'आधार' ह्या संस्थेचा समाजाच्या सेवेतील योगदानाचा किती मोठा वाटा असू शकतो ह्याची कल्पना करूनच मन सुन्न होऊन जातं...  त्या मुलांच्या चेहऱ्याकडे बघून झालं तसं.
                आज संस्थेत आश्रयास असलेल्या मुलांमध्ये, सर्व प्रकरच्या शारीरिक आणि मानसिक असमर्थता आहेत. त्यावर, त्यांच्याच मानसिक धैर्यावर उभं राहून मात  करण्यात संस्थेला यश मिळत आहे.   आपल्याच  कुटुंबात आई-वडिलांसोबत, भावंडांसोबत, आई-वडिलांच्या शारीरिक-मानसिक-सामाजिक  विकलांगेपोटी, अशा मुलांचं जगणं असह्य झालेलं असताना, त्यांना अक्षरशः दत्तक घेऊन, मांडीवर असलेल्या बाळासारखं, त्यांचं सगळं करण्याची मेहनत घ्यावी लागतेय, त्यांना न्हाऊ घालण्यापासून सकाळ-दुपार-संध्याकाळ घास भरवण्यापर्यंत करावं लागतंय, ही फार मोठी कौटुंबिक जबाबदारी पार पाडली जातेय. कोणत्याही मुलाला संस्था सोडावीशी वाटत नाहीय, घेरी गेलेलं प्रत्येक मूल  चार दिवसांनी पुन्हा 'आधाराला'  "आधार" कडे परत येतंय, ही  किती जमेची बाजू आहे.  कोणाच्याही आयुष्यात इतर कोणत्याही नात्याची जागा घेता येते परंतु आई वडिलांची जागा घेणं वाटतं तेवढं सोपं काम नाहीय.
                त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्यातल्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी, मनोरंजनासाठी, देखभालीसाठी, शारीरिक स्वास्थ्यासाठी जी काय दक्षता घेतली जातेय त्या शक्तीला आणि सामर्थ्यवान माणुसकीला मनोमन सलाsssssम. आणि म्हणूनच, आम्हाला मिळालेलं दुपारचं भोजन म्हणजे अशा ‘मानवतेच्या मंदिरातील महाप्रसाद’ च लाभला होता ह्याचे कधीही विस्मरण होणार नाही. "आधार" नावाच्या मंदिराचा पत्ता-"आधार" , पुलगाव, ठाकूरवाडी, बदलापूर (पश्चिम). महाराष्ट्र.                                
                                                                                  xxxxxx
सुभाष जिरंगे,


भ्रमणध्वनी क्र.  ९९६९० ६०५०४,   
subhashjirange@gmail.com   

Published in  'Mi Marthi'  marathi newspaper on dtd. 23-08-2015 on page no. 15            

Sunday, June 22, 2014

दुष्काळ…

दुष्काळ

गेल्या महिन्यात माझ्या पत्नीच्या चंडीगडच्या मैत्रिणीने घरी प्रसाद आणला… एक छानशी शाल आणि गोड प्रसाद म्हणून गव्हाची सुकडी… मी नमस्कार करून त्या गोड सुकडीचा प्रसाद तोंडात टाकला.  ती तोंडात विरघळत असतानाच माझ्या मनाचा ताबा घेत, मला घेऊन गेली… चाळीस वर्षापूर्वीच्या काळात… तो महाभयावह काळ जसाच्या तसा माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला…

तो काळ… ज्यावेळेस माझ्या आयुष्यातील वयाची पांच वर्षेही पूर्ण केली नसावीत मी.  ज्या वयात अल्लड… निरागस बालपणाचा आनंद लुटायचा, त्या वयात सृष्टीवरच्या एका महान संकटाला सामोरे जाणाऱ्या समाजातील, एक घटक बनण्याचं माझ्या नशिबी आलं होतं… महाराष्ट्रातील एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळाचं ते विदारक सत्य होतं…

विधात्याने माणसाला मेंदू दिलाय विचार करायला.  मन दिलंय भावना व्यक्त करायला. भाषा दिलीय भावना प्रभावीपणे मांडायला. शब्द भांडार आहे भाषा प्रगल्भ करायला… आज याच भाषेच्या आधारामुळे जीवनातील साहित्य उभं राहिलंय… आयुष्याच्या जीवनग्रंथातील सुख-दुःखांची पाने उलगडून त्यातील अंतरंग जसेच्या तसे मांडण्याचे कार्य साधलं जातंय… ते अनुभवाच्या शिदोरीतून

तो कोरडा दुष्काळ होता. दरवर्षी नियमित वेळेत आपली हजेरी लावणारा वरूणराजा ह्या वर्षी कुठे गायब झाला आहे?  सर्वच शेतकऱ्यांप्रमाणे सामान्य लोकांनाही पडलेल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, जसं सगळ्या जाणकारांनाही मिळालं नाही, तसं मांत्रिक तसेच देवदेव करणाऱ्या भगत मंडळींनाही मिळालं नाही. हेच काय, पण खुद्द सरकारी यंत्रनेकडेही त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं त्यावेळेस.  वरुण राजाची वाट बघून शेवटी शेतकरी कुटुंबांनी पेरण्या सुरु केल्या. आपल्या नशिबाच्या वाट्याला आलेल्या ज्या जमिनीच्या तुकड्यात पूर्ण कुटुंबाची गुजराण करायची, त्याच तुकड्यातील धरणी मातेला साकडं घालून गरीब शेतकऱ्यांनी पेरणीचं  पाऊल उचललं…

डोक्यावरील तळपत्या सूर्याच्या कडकडीत उन्हाने, भौगोलिक रचनेनुसार आधीच काळ्या असलेल्या मातीचा चेहरा, अधिकच काळवंडून गेला होता. तिच्या जिवातील तो शुष्कपणा आमच्यापेक्षा शेतकऱ्यांना जास्त जाणवत होता. अंगाची लाहीलाही करणारी उन्हं, धरतीमातेच्या अगदी खोलवर पोटात शिरून, शिल्लक असल्या-नसल्या पाण्याचा अंश शोषून घेत होती. मग काय ओलावा राहणार तिच्यात… स्वतःत प्राण आणायला आणि इतरांचा प्राण वाचवायला ? भेगाळलेल्या जमीनीचं ते वास्तव रूप, बघणाऱ्याच्या डोळ्यांच्या खाचा करत होते. खूप खोल जखमा होत्या त्या… मलमपट्टीने बऱ्या न होणाऱ्या.  त्याच तळपत्या सूर्याच्या धगीने जमिनीत रुजू पाहणाऱ्या त्या तृनधान्यांचा श्वास कोंडला गेला. अन बेचिराख होऊन त्याच मातीत विलीन झाली.  इकडे पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र मनःस्थिती फार कोलमोडून गेली. सगळीडेच अन्न धान्याचा तुटवडा भासु लागला… जनावरांना चारा मिळणं दुरापास्त झालं. ओला नाहीच पण सुकलेल्या चाऱ्याचा साठा सुद्धा संपुष्टात आला. जिथं जनावरांना खायलाच काही नाही तर दुध तरी कोठून मिळणार शेतकऱ्यांना ? काही लोकांचे ते एक उपजीविकेचे साधन होते तेही संपलं.  उष्णतेच्या त्या धगीने ओसाड पडलेली माळरानं डोंळ्यात आग फेकीत होती. सभोवतालच्या झुडुपांनी तर केव्हाच जमिनीत समाधी घेतली होती. वर्षानुवर्षं दिमाखात उभी असलेली झाडं मात्र मुंडण केल्यासारखी ओकीबोकी पडली होती. 

सगळीकडे कल्लोळ माजला होता. पिण्याचा पाण्याचा वणवा पेटला. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या   लज्जित होऊन कोरड्या पडल्या होत्या… अंथरुणावर मरणासन्न अवस्थेत पडलेल्या रुग्नासारखं आपलं अंग टाकून दिलं होतं त्यांनी… पावसाळ्यातच काय पण उन्हाळ्यातसुधा काठोकाठ भरत असलेल्या विहिरीं… त्यांनाही आता खोल तळाशी गेलेल्या पाण्याच्या पातळीची लाज वाटायला लागली होती. पण त्याही हतबल होत्या. आपली नियमित कर्तव्य पार पडायला असमर्थ ठरल्याने त्या विहिरींकडेही लोकांची पाठ फिरली  होती…

ह्या साऱ्या वणव्यात होरळपून निघत होती ती माणूस नावाची जमात. रोजगार नाही म्हणून पैसा नाही… पैसा नाही म्हणून अन्न नाही… मग उपासमार सुरु… ही शोकांतिकेची एक बाजू तर दुसरीकडे पैसा असूनही अन्न नाही ही दुसरी बाजू…. ज्यांना इतर ठिकाणी थोड्याफार प्रमाणात आधाराची आशा होती त्या कुटुंबाचं त्याचबरोबर जनावराचं स्थलांतर सुरु झालं. आपली राहती घरं सोडून लोक गेले. पण ज्यांच्यापुढे  तोही पर्याय नाही ते मात्र परिस्थितीच्या वावटळात पुरते फसून गेले होते

त्याच पहिल्या प्रकारच्या कुटुंबापैकी आमचं कुटुंब. सात माणसांचं कुटुंब. त्यातला एक सदस्य लग्न होऊन मुंबईला स्थिरस्थावर झाला होता. बाकी उरलेल्यांमध्ये पोटासाठी मारामारी…  घरातली सगळी पोरं खात्या तोंडाची… त्यामुळे वडिलांच्या नोकरीच्या तुटपुंज्या पगारात घर चालणं कठीणच. रेशनवर मिळणारं स्वस्त धान्य म्हणजे सातू,  मका,  मिलो बस्स. पण त्या व्यतिरिक्त इतर सामान आणायचं कसं आणि कोठून ? त्याही काळात जे लोक दुकाने चालवून किरकोळ मालाची विक्री करायचे, ते तरी आमच्या सारख्यांच्या प्रपंचाला लागणारं सामान उधारीवर  किती दिवस देणार ? जी काही पत होती ती ठराविक काळापर्यंत चालली; पण त्यानंतर मात्र ती संपुष्टात आली. आता उधारी मिळणंही बंद झालं.  त्या परिस्थितीत त्यांनाही दूषणं देता येत नव्हती. खाण्यासाठी  वणवण तशी पाण्यासाठी  वणवण… गावातल्या आड-विहिरींनी जणूकाही संपच पुकारला होता. पाण्याचा ठिपूस नव्हता… सारा खडखडाट झालेला.  स्मशानासारख्या भकास झालेल्या ओढ्यात, इतस्तः पसरलेल्या दगड-गोट्यातील पाण्यानेसुद्धा प्राणांची आहुती दिली होती. 'वाळूचे कण रगडीता तेलही गळे'  ह्या  उक्तीने, त्याच ओढ्यातील चार-चार  फुटावर खोल खड्डे खणून पाण्याचा थेंब हाती लागतो का तेही पाहत होतो आम्ही. इकडे तर आड आणि पोहरा एकच झाला होता.  चिमण्या-कावळ्यांना पाण्याचा थेंब मिळेनासा झाला. किमान ज्या गोष्टीला पैसे मोजावे लागत नाहीत त्या गोष्टी तरी सहज उपलब्ध होतील ही भाबडी आशा उराशी बाळगून आमच्या सारखे हजारो कुटुंबं रान न रान पालथे घालत होती.  त्यासाठी  वणवण सुरु…  ह्याss मोठाल्या घागरी घेऊन मैल न मैल दूर जावं लागत होतं पाण्यासाठी. त्या लोखंडी घागरी फार वजनाच्या.  पण करणार काय ? छोट्या कळशीत पाणी कमी मावते म्हणून मोठ्या घागरी… शिवाय एकदा नंबर लागला तर एकच कळशी… म्हणजे तेवढ्याच पाण्यासाठी पुन्हा एवढ्या लांबची पायपीट… त्यामुळे, एवढ्या दुरून खांद्यावरून पाणी वाहत आणायचं म्हणजे म्हणजे साऱ्या शरीराची कसरत. पण पर्याय नव्हता…



दुष्काळ म्हणजे भल्या मोठ्या रोगाची साथ. त्यातून कोणीही वाचू शकत नाही. लहान-मोठा…  गरीब-श्रीमंत  सगळे सारखे.  स्वर्गवासी होण्यासाठी न्यायला येणाऱ्या यमाला जसे सारेजण  सारखे अगदी दद्वतच. ह्याही दुष्काळाने कोणालाही मोकळं नाही सोडलं.  सारेच त्याचे बळी… आपल्या कुटुंबाची भुक-तहानेपोटी होणारी ससेहोलपट बघून, आई बापाच्या डोळ्यांतील आसवं ही, अपघाताने झालेल्या जखमेतून भळाभळा वाहणाऱ्या रक्तासारखी होती. लाल भडक.… किती यातना… कशा असह्य वेदना…! आपल्या पोरा-बाळांसाठी तीळ तीळ  तुटणारं त्याचं काळीज त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. आपल्या डोळ्यांदेखत आपली पिल्लं उपासमारीनं किडा-मुंगीसारखी पटापटा मरून पडावीत ह्या  कल्पनेणेच जीवात काहूर माजला होता…

आता मात्र पर्याय उरला एकच… कर्जं काढायची. कर्ज काढून सण साजरा करायचा नसतो; पण इथे जगण्यासाठी तोच रस्ता होता मोकळा दिसत होता…. सावकार नामक बांडगुळांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी ही परिस्थिती पोषक होती. ह्या भौगोलिक… आर्थिक… सामाजिक… मानसिकदृष्ट्या कोसळलेल्या कुटुंबांचे शोषण करण्यासाठी सावकार पुढे सरसावले… त्यांचा मदतीचा हाss मोठा हात गरीब कुटुंबांना जीवनदायी वाटला.  ह्या पृथ्वीतलावर प्रेषिताच्या रुपात तारणकर्ता  आपल्या समोर उभा आहे, ह्या जाणीवेने त्यांनी त्याच्या स्वागतासाठी आपल्या  कमकुवत… मनोदुर्बल्याच्या  पायघड्या घातल्या… आणि इथेच घरघर लागली प्रत्येकाच्या संसाराला. घरातला एक-एक जिन्नस गहाण ठेऊन, प्रसंगी तो विकून पैसा मिळवला केला. तशानेच आपला जीव ह्या भीषण परिस्थितीत तग धरू शकेल एवढीच आशा त्यांना जगण्यासाठी पुरेसी होती…

सावकाराचा तो मदतीचा हात म्हणजे कर्जाचा उंट होता. घरात शिरताना खूप छोटा होता. पण हळूहळू तो वाढत गेला. घराच्या ज्या चौकटीतून त्याने घरात प्रवेश केला, तीच चौकट त्याला घराबाहेर पडायला लहान पडू लागली.  पहिलं कर्ज फेडायच्या आतच दुसरं कर्ज घेण्याची वेळ आली. कर्जफेडीचा वायदा तोच. शर्त ठरलेली.  एक वेळ… दुसरी वेळ… तिसरी वेळ… कर्ज उचलण्याच्या वेळा वाढत गेल्या तरी परतफेडीचं नाव नाही. परतफेड करणार तरी कशी? एका दमडीचीही कमाई नसल्याने कर्जाच्या व्याजाची परतफेड दमडीनेही कमी होत नव्हती… सावकार मंडळी ठरलेल्या वेळेला हफ्ता वसुलीसाठी येऊ लागले. त्यांचा तगादा सुरु झाला. मानसिक पिळवणूक सुरु झाली. मग मात्र हवालदिल झालेले कुटुंबप्रमुख सावकार येण्याच्या वेळेस घराबाहेर पडू लागले. आपलं तोंड लपवू लागले. घरी असलेल्या मुलांना काहीतरी खोटंनाटं कारण सांगण्याची वेळ आली. त्यात एक गोष्ट समाधानाची होती, ती म्हणजे ती सावकार मंडळी कर्जबाजारी झालेल्या कुटुंबातील मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास देत नव्ह्ते… जोपर्यंत हातात पैसा येत नव्हता तोपर्यंत हा लपंडाव चालूच होता…

जसं बाहेरचं वातावरण तप्त अगदी तसाच पोटातला जठराग्नी तप्त. तो शमणं आता जिकरीचं होऊन बसलं. कर्जाचा मार्ग आतासा बंद झाला होता. संसार उध्वस्त व्हायला निघाले. नाही म्हणायला घराच्या चार भिंती अन अगदी विकून किंवा गहाण ठेवून, घराच्या फडताळावर निश्चलपणे पडून राहिलेली दुःखी कष्टी  उरली सुरली जर्मनची (अल्युमिनियमची ) भांडी… हाच संसार.  त्या काळात संसाराची परिभाषाच बदलली… सुखी माणसाचा सदराच पार फाटून गेला होता… किती ठिकाणी ठिगळं लावायची आणि किती वेळा ? सारी लक्तरं वेशीवर टांगल्यासारखी अवस्था झाली होती साऱ्या कुटुंबांची…  दाही दिशा वणवण भटकंती. अन्नाची दाणादाण. घरातल्या एखाद्याला जरी काम मिळालं तरी रात्रीच्या जेवणाची आशा लागायची. जेवण तरी काय ? त्या मजुरीच्या पैशात पावट्याच्या शेंगांचे वाटे आणायचे. चुलीवर पाण्यात मिठाचे चार खडे टाकून त्या शेंगा उकडून घ्यायच्या  अन त्या आपापसात वाटून घेऊन   सोलून खायच्या.  त्याची भाजी करावी किंवा कालवण करावं तर तेल-तिखट… कांदा-लसूण  हवा. शिवाय त्याच्या जोडीला भाकरी हवी. तीही आता दृष्टीआड झाली होती. काही वेळेस तर नुसते गहू उकडून, अन्नाला आसुसलेल्या आपल्या पोटाची खळगी भरायचं काम करावं  लागत होतं…  सगळ्याच कुटुंबांचे, घराबरोबर वासेही फिरले होते… सारा आसमंत ओसाड माळरानासारखा शुष्क झाला होता. उगवत्या सूर्याच्या साक्षीने दिवस सुरु झाला तरी रोजगाराची हमी नाही मिळायची. त्याकाळात रात्रींसोबत दिवसही वैऱ्याचे झाले होते. त्यामुळे सारे दिवस असेच चिंतेत उगवायचे. अन मावळताना मात्र जीवघेणी तळमळ… उद्या मरण आहे म्हणून आजचं जगणं आहे की काय ? असा प्रश्न पडायचा…

दुष्काळ म्हणजे एक काळसर्प होता… साऱ्या मानव जातीला गिळंकृत करत होता… ज्या वृद्ध मंडळींनी आपल्या उभ्या आयुष्यात असा काळ पाहिला नव्हता तो त्यांच्या मावळतीच्या काळात त्यांना पाहावा आणि सोसावा लागतोय यासारखं त्यांच्या लेखी दुसरं दुःख नव्हतं. हा काळच बघायचा राहिला होता त्यांच्याकडून. आपल्या आयुष्यातील सुख-दुःखाचे चढ-उतार त्यांनी लीलया पार केलेले असल्याने ह्या काळात त्याचं धीरगंभीर व्यक्तित्व त्यांच्या कुटुंबाला आधार देत होते…

वैराण वाळवंटातील तापलेल्या वाळूवर, चालताना होणाऱ्या दमछाकीपेक्षा, ह्या रणरणत्या उन्हाने कोरड्या पडलेल्या, आयुष्याच्या ह्या वळणावर चालताना होणारी दमछाक, जास्त तीव्रतेने जाणवत होती… उंटासारखं आपलंही शरीर असायला हवं होतं असं त्या वयात मला वाटत होतं. अन्न नाही निदान पाणी तरी सहा-सहा महिन्यासाठी साठवून पुरवून-पुरवून पिता आलं असतं… आजचा दिवस भयाण परिस्थितीत गेला याचं दुःख मनाला सलत असताना त्यातून समाधान म्हणजे आयुष्यातील असा वाईट दिवस निघून गेला… कमी झाला… अशा ह्या विचित्र मानसिकते मध्ये, आपलं आयुष्य असं एक-एक दिवसांनी कमी होतंय याचं काडीमात्र दुःख नव्हतं आम्हाला.  मृत जनावराच्या शरीरावर आपला हक्क दाखविणारी गिधाडे, उद्या उपासमारीने गतप्राण झाल्यावर आमच्याही शरीरावर तसाच हक्क दाखवणार… आपल्या शारीराच्या प्रत्येक अवयवाला दोन्ही बाजूंनी ओढून ते छिन्न विछिन्न करून… त्याचे छोटे छोटे तुकडे करून मssस्त मेजवानीचा आनंद घेणार… ह्या विचाराने माझं बालमन त्यां गिधाडांच्याच धारदार चोचीने कुरतडलं जात होतं.  उद्याचा दिवस असाच येणार…  आजच्यासारखा… ही भीती मनामध्ये घट्ट मूळ धरून बसली होती. दिवसामागून दिवस-रात्रीमागून रात्र जात होत्या… परंतु परिस्थिती, होती त्यापेक्षा     जास्त खालावत चालली होती. सगळी स्वप्नं… आशा… आकांक्षा… सगळ्या सगळ्यांचा चक्काचूर झाला होता. पण 'ब्रम्ह सत्य जग मिथ्या…’ त्याही काळात माणुसकी नावाचं ब्रम्ह सत्य होतं… जिवंत होतं. एकमेकांना नैतिक आधार द्यायला तीच माणुसकी सगळ्यांचा आधारस्तंभ होती. तीच्या जिवंतपणामुळेच माणूस जिवंत होता… त्याच माणुसकीतून पाझरत असलेला आशावाद, उद्याच्या उज्वल पहाटेची चाहूल देत होता…

  आतासं कुठे दुष्काळाचं भीषण चित्र शासकीय यंत्रणेसमोर उभं राहिलं होतं. नेते मंडळी… शासकीय अधिकारी खाडकन जागे झालेले दिसले. गावागावांची पाहणी सुरु झाली. ग्रस्त कुटुंबांची गणती सुरु झाली. आकडेवारी तयार… शासन दरबारी ह्या गोष्टीचे पडसाद उमटले अन शासनाने रोजगार हमी योजना  सुरु केल्या. त्याखाली वेगवेगळी कामे हातात घेतली गेली.

त्या दिवशी उगवलेला सुर्य साऱ्या कुटुंबाला एक आनंदाची बातमी घेऊन आला होता. त्याही परिस्थितीत जीवाचं रान करून दुष्काळाशी दोन हात करत उभ्या असलेल्या झाडांवरील निरस झालेली पाने ताजीतवानी होऊन उठून उभी राहिल्यासारखी वाटत होती. त्यांच्याही जीवात जीव आला होता. आपल्या सावलीखाली वाढत असलेली… खेळणारी… बागडणारी…  पोरं  सोन्याचे दोन घास खाऊन आता शांत झोपी जातील ह्याच जाणीवेने  जणू ती हर्षोल्लीत झाली होती. त्या परिसरात पाझर तलावाचे काम हाती घेतले गेले. पंचक्रोशीतील सर्वच कुटुंबाना हायसं वाटलं. काम सुरु झाले… कुटुंबातील प्रत्येक मोठ्या सदस्याला रोजगार मिळाला… आनंदाला भरतं आलं होतं.  त्या दिवशी गावात आनंदी वातावरणाचा परिमल दरवळत होता…

त्या दिवशीची सुंदर पहाट सोनेरी किरणांच्या तेजाने उजळून निघाली होती. रोजगारप्राप्त लोक मनाच्या नव्या उभारीने घरातून बाहेर पडले.  एकमेकांच्या सोबतीने… गटागटाने… गावातील तो  खडबडीत मुरमाड रस्ता पादाक्रांत करू लागले. मुरमाड रस्त्यावर सर्वत्र फुफाटा पसरला होता… पायात पायतान नसलेल्या दीन लोकांच्या पाऊलांना त्या लालसर पांढऱ्या रंगाच्या मातीचा, हलकासा उबदार स्पर्श होत होता. तिचा  तो स्पर्श इतर दिवसांपेक्षा खूपच वेगळा जाणवत होता. त्या खेडूत लोकांचं सारं आयुष्य त्याच मातीत मिसळून गेले असल्याने तिच्या त्या कोमल स्पर्शातून एक प्रकारची स्फूर्ती… जिव्हाळा… आधार… मिळत असल्याचं, त्या लोकांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होतं. आपलं सारं शरीर गालीच्यासारखं रस्त्यावर पसरून, लोकांसाठी त्याच्या जणू पायघड्याच घातल्या आहेत असा भास होत होता. लोकांच्या चेहऱ्यावरचं ओसंडून वाहात चाललेलं समाधान, प्रत्यक्षात त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर परावर्तीत झालेलं दिसत होतं… आज कितीतरी महिन्यानंतर त्यांच्या आशेला पालवी फुटली होती… आजचा दिवस उद्याचं भवितव्य ठरविणार असेल तर आज जगायला मिळणार हेच इच्छापूर्तीचं समाधान, आभाळाएवढं मोठं होतं…

लोकांचा कामाचा पहिला दिवस… त्या रोजगाराच्या पहिल्या दिवशी, मीही हजेरी लावली होती तिथे आई-भावांबरोबर… सर्व सामान्यपणे बाहेरची परिस्थिती कशीही आणि कितीही भयानक असली… कितीही भेदक असली… करुण असली… तरी त्याची धग प्रत्यक्ष पोराठोरांना नाही लागत. किंबहुना ती लागूच नये याची आई-वडील खूप काळजी घेतात. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे काबाडकष्ट करायची तयारी असते त्यांची. कुटुंबामध्ये जी समंजस पोरं होती ती आपल्या आई-बाबांना मदतीचा हात देत होती. आजपर्यंत ज्या कामाची सवय नाही किंवा ते कधी करायची वेळच  आली नाही,  ते काम करायला आजच्या परिस्थितीने  भाग पाडलं  होतं त्यांना. अर्थात, त्या दुःखाचा लवलेश ही त्यांच्या मनात डोकावताना दिसत नव्हता.  कारण आजच्या कठीण प्रसंगी कुडीतील प्राण वाचवायला तेच एक वरदान होतं. जरा अवघडच जात होतं सारं…  हातात खोरं, कुदळ, पाटी घेणं… त्या कडकडीत उन्हात अशी कष्टाची कामं अंगातून घाम निघेपर्यंत करायची म्हणजे जीव मेटाकुटीस. काही पुरुष मंडळी अंगातला सदरा काढून, उघड्या अंगाने काम करताना दिसत होती. कारण एकच… घामाने कपडे खराब झाली तर धुवायला पाणी नाही. तीच-तीच कपडे तीन-तीन चार-चार दिवस घालायची हे अंगवळणी पडलं होतं.  त्या कष्टकरी लोकांमधल्या काहींचं पोलादी शरीर, कष्टाचं काम करताना आगदी पिळदार दिसत होतं. त्या शरीराला एक प्रकारची तकाकी आली होती.  आग ओकीत असलेल्या मध्यान्हीच्या तळपत्या सूर्याच्या उन्हानं, डोक्यावरील केसातून घामाच्या धारा, सरळ गळा-मानेवरून खाली छाती-पाठीवर ओघळताना दिसत होत्या. त्यांचं ते घामानं डबडबलेलं शरीर, उद्याच्या शाश्वत वाटचालीची ग्वाही देत होते…  

नित्यनेमाने मीही त्या पाझर तलावाच्या कामाच्या ठिकाणी जात होतो. घरापासून जवळपास पाच किलोमीटर दूर असणाऱ्या त्या तलावावर, भर दुपारी अनवाणी पायाने जाताना कष्ट पडत होते. मुरमाड रस्त्यावरील उष्ण फुफाट्याचे पायाला बसणारे चटके थेट मेन्दुपर्यत जात होते. त्यातूनच पर्याय म्हणून पुढचं पाऊल ठेवायला फुफाट्यात दडलेला दगड शोधत रस्ता पादाक्रांत करायचा. गावाबाहेर पडल्यावर रस्त्याच्या कडेने झाडाखालून किंवा झुडपाच्या सावलीचा आधार घेत चालायचा प्रयत्न करायचा. गावाबाहेरुन, त्या ठिकाणी जाणारा रस्ता हमरस्ता होता. कोणे एके काळी तयार झालेला. त्या डामरी रस्त्यालाही मोठाल्या भेगा पडल्या होत्या.  परिणामी, मध्येच छोटे-छोटे खड्डे तयार झाले होते. दुपारच्या वेळेस वितळलेल्या डामरावरून चालणे कष्टदायी होत असल्यामुळे त्या रस्त्यावरून न चालता कडेच्या मुरमाड मातीतून चालने सुखावह वाटत होते. शिवाय एवढे अंतर उन्हातून चालत जायचे म्हणजे तहानेने जीव व्याकूळ व्हायचा…

 अशाही बिकट परिस्थितीत काही परोपकारी लोक समाजसेवेचं व्रत हाती घेतात आणि सेवा चालू ठेवून आत्मानंद मिळवतात. तसेच एक कुटुंब होते. त्यांचे घर त्या हमरस्त्याच्या कडेलाच होते.  माझ्या गावापासून दोन-अडीच किलोमीटरवर.  चिंचेच्या झाडाखाली असलेलं त्यांचं घर म्हणजे आम्हाला परोपकाराचं मंदिर वाटत होतं.  तहानलेल्या शरीराचं शमन होत होतं तिथे. त्यासाठी घरासमोरच चौकटीच्या उजव्या बाजूला चिंचेच्या झाडाखाली दोन मोठे पाण्याचे रांजण ठवले होते. त्यावर एक जर्मनची थाळी… वर एक तांब्या… जणू आमचं विश्रांती स्थान झाला होतं ते. चिंचेच्या पारावर घाम पुसत बैठक मारायची अन गार सावलीत शरीर थंड करत, एकाच झटक्यात तो थंड पाण्याचा तांब्या घशाखाली उतरवायचा… अर्धं अंतर कापून कासावीस झालेल्या शरीराला, पाण्याच्या रूपाने तिथे संजीवनी मिळत होती. त्या रांजणातील एक तांब्याभर थंडगार पाणी, जीवनदान देत असल्याचं समाधान होतं.  आज चाळीस वर्षे उलटून गेली तरी, घशाला झालेल्या त्या थंडगार पाण्याच्या स्पर्शाची जाणीव अजूनही त्याच पाण्यासारखी ताजीतवानी वाटतेय. आजही सुखाने अंग शहारून येतेय… मन भरून येतं… आणि त्या कुटुंबाचे आभार मानण्यासाठी हात वर जातात… मनात विचार येतो… ते दिवस होते म्हणूनच की काय आजचे दिवस मी पाहतो आहे ?

हे मात्र खरं की… आजच्या दिवसांची… सुखाची… दुःखाची… नांदी ही भूतकाळातील काही प्रसंगांमधुनच झालेली असते. आपल्या समोर असलेली आजची परिस्थिती, अशाच प्रसंगांच्या श्रुंखलांनी तयार झालेली असते. तिला जोड असते ती त्या वेळच्या घडामोडींची.  

घरच्यांसाठी दुपारचं जेवण घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावरच येऊन ठेपली होती.  तीन खणांचा अलुमिनिअमचा कडीवाला डब्बा एका हातात घेऊन घरातून निघायचं. ठरल्याप्रमाणे चिंचेच्या झाडाखाली पाच मिनिटे विश्रांती… अन नंतर थेट तलाव गाठायचा.  घरातून चार घास खाऊन निघालो असलो तरी तिथे गेल्यावर आई-भावंडांसोबत दोन घास खाण्यात एक वेगळा आनंद मिळायचा. सोबत इतर मंडळी ही असायची.  अन ते सुख कधीही गमवायचं नाही असं मनानं पक्कं केलेलं. त्यामुळे एकही दिवस एकत्र जेवल्याविना गेला नाही. त्या कष्टाच्या काळातही मला भावंडांचा सहवास मिळायचा, हेही माझ्यासाठी काही कमी नव्हतं.  तिच समाधानाची शिदोरी आजही भरभरून आनंद देतेय.

पाझर तलावाचं काम सुरु होऊन आज महिना पूर्ण झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून अन्नाला पारखा झालेला पंचक्रोशीतील सारा समाज, त्यातील कुटुंबं, आज चेहऱ्यावर आनंदाचं भरतं आल्यानं, एकमेकांशी अगदी खुशीत गप्पा मारताना दिसत होती. वातावरणात खूप मोठा बदल झालेला आढळून येत होता. सर्वसामान्यपणे ह्या काळात  वाऱ्याच्या ज्या उष्ण लाटेचे झोत, अंगाची लाही लाही करत होते पण तेच झोत आता, कडाक्याच्या थंडीत रग अंगावर घेतल्यासारखे उबदार जाणवत होते.  सारी भोवतालची  परिस्थिती बदलली होती. लोकांच्या मानसिकतेत बदल झालेला दिसून येत होता.  गरिबीच्या दारूण धक्क्याने सुरु असलेले कुटुंबातील कलह आता कमी झालेले दिसत होते.

त्या दिवशी मी दुपारच्या जेवणाचा डब्बा घेऊन गेलो होतो. नेहमीप्रमाणे जेवानाचा यथेच्छ  आनंद घेतला. मी ठरवलंच होतं, जेवण झालं की लगेच घराकडे परतायचं नाही. तसा तो आठवड्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे रोजंदारीवरच्या सर्वच लोकांना कामाचा मोबदला मिळणार होता. कामावर येणाऱ्यांना खर्चासाठी थोडी आगाऊ रक्कम मिळाली होती. परंतु आज पूर्ण महिन्याचा पगार मिळणार होता. माझीही उत्सुकता शिगेला पोहोचलेली… माध्यान्हीचा सूर्य हळूहळू मावळतीला कलू लागला होता. त्या परिसरावर होणारी सोनेरी किरणांची बरसात मंत्रमुग्ध करून टाकत होती… डोंगराळ भागातल्या त्या ओबडधोबड जमिनीवरील छोट्याशा सपाट जागेवर, एका सरकारी अधिकाऱ्याचे आणि बाजूला ठेकेदाराचे टेबल लागले होते. जसजशी काम बंद करण्याची वेळ समीप येऊ लागली, तशी लोकांची धावपळ-गडबड होताना दिसू लागली. सगळे लोक आपापल्या पिशवी-सामानाच्या जागेवर येऊन आवराआवरी करू लागले. ज्याचे  जसे लवकर होईल तसतसे ते लोक मुकादमच्या सूचनेनुसार एका रांगेत उभे राहू लागले. रांगेत उभ्या असलेल्या लोकांचा चेहरा आज वेगळंच काहीतरी सांगून जात होता. आपापसात चर्चा सुरु होत्या. एका हातात कापडाची पिशवी त्यातच जेवण बांधून आणलेली फडकी, थाळी, पाण्यासाठी आणलेला पेला-नाहीतर तांब्या. त्या रांगेत येऊन उभं राहताना एकमेकांच्या पिशवीला पिशव्या लागून होणारा भांड्यांचा आवाज निराळाच ऐकायला येत होता. परंतु कानांना अवीट गोड वाटत होता. ती भांडीही आपापसात काहीतरी कुजबुज करत आहेत असा भास होत होता. त्या खुल्या आसमंतात चढ-उतारावर लोकांनी लावलेली रांग म्हणजे एक शिस्तबद्ध समाजाचं प्रतिक होतं. निसर्गानं कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांनाच एका रांगेत उभं केलं होतं. रोजंदारीचं वाटप सुरु झालं तसा एक एक नंबर पुढे सरकू लागला.  माझीही आई-भाऊ रांगेत उभे होते. खरं बघायला गेलं तर, माझी त्यांच्या सोबत उभं राहण्याची आवश्यकता नव्हती. पण एक प्रकारची उत्सुकता होती मला. तो दिवस… त्यातला आनंद मलाही अनुभवायचा होता. कदाचित तोच आनंद मला आयुष्यभर ह्या काळाची कायम आठवण करून देत राहणार होता…  

   समोरचे नंबर जसे कमी होऊ लागले, तसे मागचे लोक पुढे पुढे सरकू लागले. माझीही पावलं आईसोबत पुढे सरकत होती. आम्ही त्या टेबलापाशी जाऊन थडकलो. मुकादमाने एका कागदावर, टेबलवर बाजूलाच असलेल्या शाईच्या पॅडमध्ये आईच्या हाताचा अंगठा बुडवून, त्याचा ठसा घेतला आणि दहा, पाच आणि एक रुपयाच्या नोटा हातावर टेकवल्या.  एक महिन्याची कमाई हातात पडल्यावर चेहऱ्यावरचा आनंद ती लपवू शकली नव्हती.  माझ्याकडे जी पिशवी होती त्यातला एक डबा त्यांनी बाहेर काढून पुढे करायला  सांगितला. त्यात मोठी पळीभर गोड खाऊ टाकला. तो खाऊ पाहून मला लगेच खाण्याची इच्छा झाली.  गेले काही महिने अशा प्रकारच्या खाऊला पूर्णपणे मुकलो होतो.  तो गोड खाऊ खाण्याच्या इच्छेने तयार झालेले चेहऱ्यावरचे भाव त्या मुकादमाच्या नजरेतून सुटले नाहीत.  त्यांनी प्रेमाने मला हात पुढे करायला सांगितला अन माझ्या हातावर मुठभरेल एवढा खाऊ दिला. क्षणाचाही विलंब न करता मी तो खायला सुरुवात केली… खाताना जे आत्मिक समाधान मिळत होतं, ते माझ्या हृदयात कायमचं कोरलं जात होतं ह्याची जाणीव होत होती मला.  दुष्काळ पूर्ण संपल्याची म्हणण्यापेक्षा, तो आलाच नव्हता अशी भावना झाली माझी. माझ्या मुठीत पडलेला गोड खाऊ म्हणजे सुकडी होती ती!!! त्या सुकडीची चव आजही माझ्या जिभेवर जशी होती तशीच रेंगाळत, मला तोच आत्मानंद देतेय हे मात्र खरं !
                           ----x----
दिनांक- 03-02-2014         

[Edited story published in PRAHAR newspaper in two parts.viz-dtd.  08/06/2014 and 15/06/2014-


&

http://epaper.prahaar.in/detail.php?cords=20,1510,1076,2274&id=story5&pageno=http://epaper.prahaar.in/15062014/Mumbai/Suppl/Page2.jpg ]